- शंतनू खुजे
कर्नाटकाच्या तुमकूरू जिल्ह्यातील गुब्बी तालुक्यातील एका गरीब घरात जन्मलेल्या सालुमार्दा थिमक्का यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही, उपजीविकेसाठी त्यांनी गावाजवळच्या खाणीत रोजंदारीवर मजूर म्हणून काम केले. नंतर त्यांचे लग्न चिक्कय्या नावाच्या गुराख्याशी लावून देण्यात आले.
या जोडप्याच्या जीवनात सर्वात मोठी खंत होती ती म्हणजे त्यांना कुठलीही अपत्य नव्हती. अनेक वर्षे त्यांना मूलबाळ झाले नाही, ज्यामुळे त्यांना अनेकदा सामाजिक टीकेचा सामना करावा लागला. या वेदनेवर मात करण्यासाठी आणि जीवनातील ही पोकळी भरून काढण्यासाठी थिमक्का आणि त्यांच्या पतीने एक आगळावेगळा मार्ग स्वीकारला, तो मार्ग म्हणजे वृक्षारोपणाचा. त्यांनी झाडांनाच आपली मुलं मानलं आणि त्यांच्याच पालनपोषणात आपले संपूर्ण जीवन समर्पित केले.
'सालुमरदा' या उपाधी मागचा इतिहास
थिमक्का आणि त्यांच्या पतीने कर्नाटकातील हुलिकल ते कुदूर या दरम्यानच्या राज्य महामार्गाच्या कडेला वडाची रोपे लावण्यास सुरुवात केली. 'सालुमरदा' या कन्नड शब्दाचा अर्थ आहे ‘झाडांची रांग’ आणि त्यांच्या या वृक्षारोपणाच्या महान कार्यामुळेच त्यांना ही उपाधी मिळाली.
पहिल्या वर्षी त्यांनी 10 झाडं लावली. त्यानंतर दरवर्षी ही संख्या वाढवत नेत त्यांनी सुमारे 4.5 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा एकूण 385 वडाची झाडं लावली. झाडं लावणं हे सोपं काम नव्हतं. विशेषतः कोरड्या भागात या रोपांना जगवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागले. थिमक्का आणि त्यांचे पती रोज भल्या पहाटे उठून, चार किलोमीटर डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जात आणि या रोपांना पाणी देत असत. रोपांची मुळे मातीत घट्ट रुजेपर्यंत, म्हणजेच सलग सुमारे दहा वर्षे त्यांनी झाडाला पाणी देण्याचे हे काम नित्यनेमाने केले. त्यांनी काट्यांच्या कुंपणाने रोपांचे जनावरांपासून संरक्षण केले.
स्वतःच्या तुटपुंज्या उत्पन्नातील बराचसा पैसा त्यांनी या रोपांच्या संगोपनासाठी खर्च केला. त्यांनी 385 वडाच्या झाडांसह आपल्या जीवनात 8,000 हून अधिक झाडं लावली आणि त्यांचे पालनपोषण केले. 1991 मध्ये पतीच्या निधनानंतरही त्यांनी आपले हे कार्य थांबवले नाही. हुलिकल ते कुदूर या महामार्गावर असलेली 385 वटवृक्षांची रांग आज एक ऐतिहासिक आणि पर्यावरणीय ठेवा बनली आहे. या वृक्षांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना सावली आणि शुद्ध हवा मिळते ती फक्त या जोडप्याच्या कष्टामुळे.
थिमक्का यांचे कार्य अत्यंत निस्वार्थ असले तरी, त्यांच्या या योगदानाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 1990 च्या दशकापर्यंत थिमक्का तुलनेने अज्ञात होत्या पण 1996 मध्ये त्या काही योगायोगाने प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटकाचे एचडी देवेगौडा अनपेक्षित पणे भारताचे पंतप्रधान बनले.
त्याच काळात, स्थानिक पत्रकार एन.व्ही. नेगलूर यांनी थिमक्का आणि तिच्या वृक्षारोपणाच्या कार्याची माहिती पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्यांना दिली. यानंतर देवेगौडा यांनी थिमक्का यांना नवी दिल्लीला बोलवून घेतले आणि नंतर पंतप्रधानांनी त्यांना राष्ट्रीय नागरिक पुरस्कार प्रदान केला. या एका घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य कायमचे बदलून टाकले.
तेव्हापासून, थिमक्का यांना अनेक पुरस्कार मिळाले, असंख्य प्रसंगी सन्मानित केले गेले, विविध सरकारांनी, पर्यावरण कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी त्यांना पुरस्कार दिले.
- पद्मश्री पुरस्कार - 2019 मध्ये भारत सरकारने त्यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले.
- इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार - वृक्षारोपण आणि संवर्धनातील योगदानासाठी त्यांना 1997 मध्ये ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- बीबीसीची यादीत समावेश - 2016 मध्ये बीबीसीने त्यांच्या 100 प्रभावी आणि प्रेरणादायक महिलांच्या यादीत थिमक्का समावेश केला होता.
- नडोजा पुरस्कार - हम्पी विद्यापीठाकडून त्यांना 2010 हा सन्मान मिळाला.
या आणि अशा अनेक सन्मानांनी थिमक्का यांचे कार्य जगासमोर आणले, ज्यामुळे त्या सामान्य नागरिकांसाठी आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी त्या एक मूर्तिमंत उदाहरण बनल्या.
थिमक्का आपल्यातून गेल्या असल्या तरी त्यांचा वारसा अजरामर राहील...
थिमक्का यांनी लावलेली हुलिकल-कुदूर रस्त्यावरील 385 वटवृक्षांची रांग आजही डौलात उभी आहे आणि येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाचे महत्त्व शिकवत राहील.
थिमक्का यांनी फक्त स्वतः हे कार्य केले नाही तर अनेक लोकांना वृक्षारोपणासाठी प्रेरित केले. त्यांच्या नावावर अमेरिकेत 2003 मध्ये 'थिमक्का रिसोर्सेस फॉर एनवायर्नमेंटल एज्युकेशन' नावाच्या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. काही वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर 2010 मध्ये या कंपनीने आपले कामकाज बंद केले. 
थिमक्का यांच्या नंतर त्यांचे दत्तक पुत्र, श्री उमेश बीएन यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे. पृथ्वी बचाओ चळवळीसारख्या उपक्रमांद्वारे, ते झाडे लावत आहेत आणि शेतकऱ्यांना रोपे वाटत आहेत, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे हे अभियान टिकून राहील.
वृक्षारोपणाव्यतिरिक्त त्यांनी आपल्या गावात आयोजित वार्षिक जत्रेसाठी पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासारखी इतर सामाजिक कामेही केली.
सालुमरदा थिमक्का या फक्त एक व्यक्ती नव्हत्या तर त्या वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचं चालतं बोलतं व्यासपीठ होतं. त्यांनी झाडांना मुलांचे प्रेम दिले आणि त्या बदल्यात झाडांनी त्यांना 'वृक्षमाता' म्हणून जगभर ओळख दिली. एका सामान्य मजुरी करणाऱ्या महिलेने आपल्या निस्वार्थ कष्टाने आणि प्रेमाने जे हरित साम्राज्य उभे केले, ते येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
थिमक्का यांचा हा प्रवास पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण कार्याचे महत्त्व अधोरेखित करतो. थिमक्का यांनी झाडांना मुलाप्रमाणे प्रेम दिले आणि त्या झाडांनी त्यांना 'वृक्षमाता' म्हणून जगभर ओळख दिली. आजघडीला जेव्हा सगळीकडे वृक्षतोड करून सिमेंटीकरण केलं जात असतांना अश्या काळात थिमक्का यांना पर्यावरण संवर्धनाचा हा वारसा आपण पुढे न्यायला हवा. त्यांच्या या कार्याचा प्रकाश सतत तेवत राहो, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.






