(जतिन देसाई)
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर 11 वर्षांनी ब्रिटिशांनी पेशावरच्या किस्सा ख्वानी इथे 23 एप्रिल 1930 या दिवशी 200 ते 300 निःशस्त्र लोकांना ठार मारले होते. त्याच महिन्याच्या 6 एप्रिलला महात्मा गांधींनी गुजरातच्या नवसारी जवळच्या दांडी गावात चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला होता. दांडी यात्रा पूर्ण झाल्याच्या 17व्या दिवशी पेशावर येथे जमलेल्या पश्तुन (पठाण) लोकांवर अतिशय क्रूरपणे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता.
अनेक अर्थांनी त्याची तुलना जालियनवाला बागेशी केली जाऊ शकते. फाळणीनंतर पेशावर पाकिस्तानात गेल्यामुळे असेल, पण किस्सा ख्वानी येथील अहिंसक आंदोलकांच्या हत्याकांडाबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. 'इन्कलाब जिंदाबाद' आणि 'महात्मा गांधी यांचा विजय असो' अशा घोषणा देणाऱ्यांवर ब्रिटिशांनी गोळ्या चालवल्या, त्या दुर्दैवी घटनेला आज (23 एप्रिल, 1930) 95 वर्षे पूर्ण होत आहेत.
पेशावर ही वायव्य सरहद्द प्रांताची राजधानी, तिथले सर्वात मोठे नेते होते अब्दुल गफार खान अर्थात 'सरहद्द गांधी'. 1929 मध्ये त्यांनी खुदाई खिदमतगार (ईश्वराचे सेवक) ही संघटना स्थापन केली होती. किस्सा ख्वानी अशी जागा होती की ज्याठिकाणी अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून येणारे किंवा परत जाणारे व्यापारी व इतर चहा-नाश्ता करायला थांबायचे आणि लोकांसोबत गप्पा मारायचे, वायव्य सरहद्द प्रांतात मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य आंदोलनात पश्तुन समुदाय सहभागी झाला होता.
(खान अब्दुल गफार खान अर्थात 'सरहद्द गांधी', ज्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार संघटना स्थापन केली.)
सरहद्द गांधी आणि त्यांची खुदाई खिदमतगार
अब्दुल गफार खान हे महात्मा गांधीजींचे विश्वासू सहकारी होते. पश्तुन समाज पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानात विखुरला गेला आहे. 'डुरान्ड लाइन' पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळी करते. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या पश्तुन लोकांचे एकमेकांशी संबंध आहेत.
अलीकडचा अपवाद केल्यास ते एकमेकांच्या देशात सहज जाता येत होते. गफार खान आणि त्यांचे मोठे बंधू अब्दुल जब्बार खान (डॉ. खान साहेब) फाळणीच्या विरोधात होते आणि त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. बंदूक आणि तलवारी सोबत ठेवणं ही पश्तून समाजात सामान्य बाब होती आणि आताही आहे. पश्तून हा योद्धा समाज, वायव्य सरहद्दद प्रांतात गावागावात फिरून गफार खान यांनी लोकांना अहिंसेच्या दिशेने नेलं होतं.
संबंधित लेख वाचा: 1) खुदा बख्श… एक असा जादुगार ज्याला पाहिले की ब्रिटिश मुली पळून जायच्या! |
पश्तुन अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव…
गफार खान आणि पश्तुनांच्या दृष्टीने 1929 च्या डिसेंबर महिन्यात लाहोर येथे झालेले अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे होते. त्यापूर्वीच्या अधिवेशनातदेखील काही पश्तून नेते सहभागी व्हायचे, पण त्यांचे प्रतिनिधित्व व्यक्तिगत स्तरावर असायचे आणि त्यांची संख्याही कमी असायची. लाहोर अधिवेशनात सगळे बदलले. गफार खान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पश्तुन अधिवेशनात सहभागी झाले होते.
जवाहरलाल नेहरू अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 'पूर्ण स्वराज' चा ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. लाहोर अधिवेशनाने स्वातंत्र्य आंदोलनाला अधिक बळ दिले. गफार खान आणि त्यांचे सहकारी अधिवेशनातून भारावून गेले होते. या अधिवेशनानंतर गावागावांत लोक खुदाई खिदमतगारचे सभासद होऊ लागले. एप्रिल 1930 पर्यंत 'खुदाई खिदमतगार'चे अंदाजे 500 सभासद झाले होते. नंतर पुढील सहा महिन्यांत ही संख्या 50 हजारांहून अधिक झाली.
दारूमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होत असल्याने काँग्रेसची दारूबंदीची मागणी होती. दारूच्या दुकानाच्या बाहेर उभे राहून ते लोकांना दारू न घेण्याची विनंती करायचे आणि दारूची दुकाने बंद करण्याची मागणी करायचे, पाच एप्रिलला पेशावरमध्ये दारूच्या दुकानाबाहेर निदर्शने करण्याचे ठरले. दुकानदाराने त्यांना 15 दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. त्यावर काँग्रेसच्या कार्यकत्यांनी पुढचे आंदोलन 23 एप्रिलला होईल, असे जाहीर केले. 
(सहरद्द गांधी यांची लढवय्या पश्तून समूहाची खुदाई खिदमतगार संघटना.)
पेशावरमधील असहकार आंदोलन आणि ब्रिटिशांची अडवणूक
लाहोरहून परत आल्यानंतर गफार खान आणि त्यांच्या सहकान्यांनी 'खुदाई खिदमतगार'च्या तालुका आणि जिल्हास्तरावर बैठका घ्यायला सुरुवात केली होती. 21 आणि 22 एप्रिलला त्यांच्या उतमनझाई गावात प्रांतीय स्तरावरची सभा घेण्याचा निर्णय घेतला गेला. वायव्य सरहद्दद प्रांतात राहत असलेल्या सर्व पश्तून लोकांना या सभेसाठी निमंत्रित करण्यात आले. ही सभा होऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले, पण त्याचा उपयोग झाला नाही. गफार खान यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे, 'हजारो स्त्री-पुरुष सभेत सहभागी झाले.
पेशावरहून काँग्रेसचे अली गुल खान, लाल बचा व इत्तर अनेक जण सभेसाठी आले होते. पेशावरला परत जाण्यापूर्वी त्यांनी मला सांगितले की उद्या (23 एप्रिल) ते पेशावरला असहकार आंदोलन करणार आहे, त्यात मी निरीक्षक म्हणून यावे. त्यांनी असंही म्हटलं की ते खुदाई खिदमतगारचे सभासद नसले तरी उतमनझाईच्या सभेसाठी मुद्दामहून आले होते. त्या दृष्टीने मी कॉंग्रेसचा सभासद नसलो तरी पेशावरला कार्यक्रमासाठी अवश्य यावे.
दुसरीकडे, वायव्य सरहद्द प्रांतातील लोकांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या फौजदारी कायद्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी काँग्रेस समितीने पाठवलेल्या समितीला 22 एप्रिलला वायव्य सरहद्द प्रांतात जाऊ दिले नाही. त्यांना अटकच्या पुलावर अडवण्यात आले. ही बातमी पेशावरला पोहचताच लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
23 एप्रिल 1930 चा तो काळा दिवस…
सायंकाळी प्रचंड मोठी सभा झाली. दुसऱ्या दिवशीही निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. 23 तारखेला गफार खान आणि त्यांचे सहकारी पेशावरला निघाले असताना त्यांना पकडण्यात आले. त्यांना सुरुवातीला चारसद्दा येथे नेण्यात आले. तिथेही लोक मोठ्या संख्येने गोळा झाले. दुपारी त्यांना मर्दानला नेण्यात आले. तिथे त्यांना पेशावर येथे पोलिस गोळीबारात अनेक जण मारले गेल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी गफार खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रिसालपूर येथे नेण्यात आले. तिथे न्यायालयाने त्यांना तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली. गफार खान यांच्या अटकेमुळे लोक अधिक खवळले.
23 एप्रिलला नेत्यांच्या अटकेचा निषेध करणारे सुमारे दोन हजार निदर्शक काबुली गेट ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी गोळीबार सुरू केला. परिस्थिती चिघळल्यानंतर शस्त्रसज्ज ब्रिटिश सैनिक तिथे आले. जमावाने दगडफेक केल्याचे उत्तर म्हणून ब्रिटिश सैन्याने बाजारात वाहने घुसवली आणि निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात तब्बल 200 ते 300 लोक मारले गेले. यावेळी गढवाल रायफल्सनी हिंमत दाखवून निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्यास नकार दिला. पण ब्रिटिशांनी इतर जवानांना बोलावून घेतले आणि त्यांनी लोकांवर गोळ्या चालवल्या.
(23 एप्रिल 1930 रोजी ब्रिटिश सैन्याने खुदाई खिदमतगार संघटनेच्या सभेवर गोळीबार केला ज्यात 300 पेक्षा अधिक लोकं ठार झाले.)
ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारात 300 पेक्षा जास्त लोकं मारली गेली
ब्रिटिशांच्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने विठ्ठलभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती पाठवली. त्या समितीला देखील सरकारने वायव्य सरहद्द प्रांतात जाऊ दिले नाही. विठ्ठलभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रावळपिंडी येथे एकूण 79 साक्षीदारांची भेट घेतली आणि त्यांची निवेदने घेतली. समितीने 350 पानांचा अहवाल तयार केला, तोही ब्रिटिशांनी जप्त केला.
पण, तोपर्यंत त्या अहवालाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली होती. काँग्रेसने तो अहवाल युरोप आणि अमेरिकेत नेला. ब्रिटिशांचे क्रौर्य जगापर्यंत पोहोचले. संतापलेल्या ब्रिटिश सरकारने गफार खान आणि खुदाई खिदमतगाराला काँग्रेसपासून वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र त्यांना यश मिळालं नाही.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हे हत्याकांड एक महत्त्वाचा टप्पा होता. यानंतर संपूर्ण भारतात निदर्शने सुरू झाली. मानवतेला काळिमा फासणारे, वायव्य सरहद्दद प्रांतातील पश्तुनांचा अहिंसक लढा दडपून टाकणारे हे ब्रिटिशांचे क्रौर्य, जालियनवाला बाग हत्त्याकांडाएवढेच भयंकर आहे.
(सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स)






