(समीर गायकवाड)
दंगली शहरांची ओळख बदलतात. बंगालच्या मुर्शिदाबादची ओळख आता धोक्यात आलीय असे वाटण्याजोगी स्थिती आहे. पूर्वी विश्वविख्यात बालुचारी रेशमी साड्यांसाठी मुर्शिदाबाद ओळखले जायचे, आता हे शहर धर्मद्वेषाच्या विळख्यात अडकलेय!
तृणमूल कॉँग्रेसची सत्ता असलेल्या बंगालमध्ये सातत्याने दंगली होताना दिसतात. वक्फ कायद्यातील बदलास विरोध म्हणून नुकतेच मुर्शिदाबाद शहर आणि ग्रामीण भागात हिंसक निदर्शने झाली. त्याला दंगलीचे स्वरूप प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ नासधूस करण्यात आली. घरे पाडली गेली, दुकाने लुटली गेली. नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले करण्यात आले.
यात धूलिया गावामध्ये देवी देवतांच्या मूर्ती बनवणारे पिता पुत्र जमावाने निर्घृण पद्धतीने ठार मारले याचा तपास वेगाने करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे. इथे हटवादी हेकेखोर आणि टोकाचे प्रतिस्पर्धी आमने सामने आहेत. त्यांच्या राजकारणात सामान्य नागरिकांचा बळी जातोय. दंगली घडत असताना पोलिस बघ्याच्या भूमिकेत असतात हा सर्वत्र येणारा अनुभव इथेही येतो. वास्तवात मुर्शिदाबादमध्ये अनेक नागरी समस्या आहेत त्यावर लक्ष द्यावे असे कुणालाच वाटत नाही. 
काय आहे मुर्शिदाबाद शहराची ओळख?
मुर्शिदाबाद पश्चिम बंगालच्या मध्यभागी आहे, त्याची पूर्व आणि उत्तर सीमा बांगलादेशशी जोडली आहे. या जिल्ह्याला भगीरथी आणि पद्मा नद्यांनी वेढलं आहे, ज्यामुळे जमीन सुपीक आहे, पण पूर आणि मातीची धूप ही समस्या आहे. या जिल्ह्याचा काही भाग कमी उंचीचा आणि दलदलीचा आहे, ज्यामुळे पायाभूत सुविधा बांधणं कठीण आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेतं दुष्काळ आणि अपुर्या पावसामुळे प्रभावित होतात. दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे जुलै-ऑगस्टमध्ये जास्त पाऊस पडतो आणि इतर महिन्यांत कमी पाऊस यामुळे शेतीवर परिणाम होतो.
बालुचारी रेशीम साड्यांमुळे प्रसिद्ध
इथलं अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे, जिथे तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया ही प्रमुख पिकं आहेत. पण अपुर्या सिंचन सुविधा आणि लहान शेतजमिनीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आहे. मुर्शिदाबादचा बालुचारी साड्यांचा रेशीम उद्योग प्रसिद्ध आहे, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि स्पर्धेमुळे हा उद्योग मागे पडतोय. यामुळे स्थानिक कारागिरांना आर्थिक अडचणी येताहेत.
संबंधित लेख वाचा: 1) भटक्या कुत्र्यांवरून शांतताप्रिय पारशी समाज मुंबईत दंगल घडवतो तेव्हा…! |
जिल्ह्यातील साक्षरता दर कमी आहे आणि विशेषतः महिलांची साक्षरता चिंताजनक आहे. यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्यात आणि सामाजिक प्रगती मंदावलीय. शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीमुळे तरुण बाहेरच्या शहरांमध्ये (जसं की कोलकाता) स्थलांतर करताहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि कुटुंबं तुटताहेत.
66% पेक्षा जास्त अल्पसंख्यांक
मुर्शिदाबादमध्ये अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या 66% पेक्षा जास्त आहे, आणि काही अहवाल सांगतात की त्यांचा सामाजिक-आर्थिक विकास इतर समुदायांच्या तुलनेत मागे आहे. पण काही क्षेत्रांत त्यांनी प्रगती केलीय. या जिल्हयाची लांबलचक सीमा बांगलादेशाशी जोडली गेलीय ज्यामुळे बेकायदा स्थलांतर आणि तस्करी यासारख्या समस्या वाढताहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि सुरक्षेवर परिणाम होतोय. सरकार इथे कमी पडतेय. 
आताच्या आणि मागील वर्षीच्या हिंसाचारामुळे स्थानिक व्यापार आणि पर्यटनावर परिणाम झालाय. विशेषतः बेलडांगा आणि जंगीपूरमधील बाजारपेठा काही काळ बंद होत्या, ज्याने स्थानिकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय.
शहरात इतक्या साऱ्या समस्या तरी…?
मुर्शिदाबाद हा भारतातील 9 वा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. शहरी भागात 19.7% लोक राहतात, आणि लोकसंख्येची घनता 1,334 प्रति चौरस किमी आहे. यामुळे शहरामध्ये गर्दी आणि पायाभूत सुविधांवर ताण आहे. शहरी भागात रस्ते, गटारे, आणि कचरा व्यवस्थापन यांची कमतरता आहे. वाहतूक कोंडी आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे स्थानिकांना त्रास सोसावा लागतोय.
शहरी भागात झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढलंय, अस्वच्छता आणि अपुर्या सुविधा यामुळे तिथल्या रहिवाशांचं जीवनमान खालावलंय. झोपडपट्टीतील कुटुंबांना पक्की घरे, स्वच्छ पाणी, आणि वीज यांचा तुटवडा भासतोय.
शहरी भागात बरेच लोक अनौपचारिक क्षेत्रात (जसं रस्त्यावरील विक्रेते, सायकल रिक्षाचालक) काम करतात, ज्यामुळे स्थिर उत्पन्नाचा अभाव आहे. यामुळे गरीबी आणि सामाजिक असमानता वाढलीय. शहरांमध्ये अनियोजित विस्तारामुळे जमीन वापर आणि नागरी सेवांवर परिणाम झालाय. शहरीकरणाचे प्रॉपर लाभ स्थानिकांना पूर्णपणे मिळत नाहीत.मुर्शिदाबादमध्ये मूलभूत सुविधांची उपलब्धता मिश्र स्वरूपाची आहे, विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये फरक आहे.
जिल्ह्याचा सरासरी साक्षरता दर 66.59% आहे, जो पश्चिम बंगालच्या सरासरीपेक्षा (76.26%) कमी आहे. शहरी भागात साक्षरता 71.8% आहे, तर ग्रामीण भागात 65.3%. शाळा आणि महाविद्यालयं आहेत, पण ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत, विशेषतः मुलींसाठी!
हिंदू आणि मुस्लिम समुदाय शतकानुशतके एकत्र
बहरमपूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ही जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य सुविधा आहे, पण ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची कमतरता आहे. ग्रामीण भागात वीज खंडित होणं आणि अपुरा पुरवठा ही समस्या आहे. शहरात ड्रेनेज व्यवस्था आहे, पण झोपडपट्ट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा अभाव आहे. शहरी भागात पाणीपुरवठा उपलब्ध आहे, पण ग्रामीण भागात अनेक गावांना स्वच्छ पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यांची अवस्था मध्यम आहे; बहरमपूर-जंगीपूरसारखे रस्ते चांगले असले, तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. 
मुर्शिदाबाद हा ऐतिहासिकदृष्ट्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्याचा जिल्हा आहे, पण जातीय सलोख्याचं इथलं चित्र संमिश्र आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदाय शतकानुशतके एकत्र राहत आहेत. बंगाली संस्कृती आणि भाषा (98.49% लोक बंगाली बोलतात) यांनी दोन्ही समुदायांना जोडलं आहे. उदाहरणार्थ, बलुचारी साड्यांच्या निर्मितीत हिंदू आणि मुस्लिम कारागीर एकत्र काम करतात.
2011 च्या जनगणनेनुसार, जिल्ह्यात 66.27% मुस्लिम आणि 33.21% हिंदू लोकसंख्या आहे. काही भागात, विशेषतः बेलडांगामध्ये, सांप्रदायिक तणाव वाढलाय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मुर्शिदाबाद हा सुसंवादी जिल्हा आहे, पण काही नियोजनबद्ध कृतींमुळे तणाव निर्माण केला जातोय.
मुर्शिदाबादमध्ये सर्व समुदाय शांततेत राहतात आणि सलोख्यासाठी प्रशासनाशी सहकार्य करतात. पण काही प्रसंगी, विशेषतः निवडणुकांच्या काळात, धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतात. मुर्शिदाबादमध्ये धार्मिक द्वेषाची काही उदाहरणं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत, पण ती सर्वत्र पसरलेली नाहीत. नोव्हेंबर 2024 मध्ये, बेलडांगामध्ये एका धार्मिक उत्सवात आक्षेपार्ह संदेश प्रदर्शित झाल्याने हिंसाचार उसळला होता. यात अनेक जण जखमी झाले होते. घरं व दुकानांचं नुकसान झालं होतं. 17 जणांना अटक झाली होती. स्थानिक पोलिसांनी याला स्थानिक वादाचे रंग दिले होते. पण काहींना हा नियोजित कट वाटतो.
मागील काही दिवसांत जंगीपूरमध्ये जी हिंसक निदर्शनं झालीत, त्यात 3 जणांचा मृत्यू झालाय आणि या दंगली प्रकरणी 138 जणांना अटक झालीय. याने हिंदू-मुस्लिम तणाव वाढलाय. एक प्रकारची धार्मिक दडपशाही इथे दिसून येतेय. काही काळ इंटरनेट बंदी आणि केंद्रीय सैन्याची तैनाती करावी लागली. गुन्हे दाखल होतील दोषी जेलमध्ये जातील मात्र जे जिवानिशी गेले त्यांचे काय? ते कधीच परत येणार नाहीत. त्यांचं नुकसान भरून येणार नाही.
धार्मिक कट्टरतावाद असणारे नेते कोणत्याही धर्माचे असोत, एखादा अपवाद वगळता कुणालाही सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांचे काही पडलेले नसते! त्यांना फक्त चिथावणी देऊन लोकांना भडकवायचे असते. आपले राजकारण साधायचे असते. विवेकी लोकांनी अशांना दूर सारले पाहिजे. आपल्या जीवनातील प्रश्नांसाठी आवाज उठवला पाहिजे.
विकास आणि प्रगतीसाठी सरकारला धारेवर धरले पाहिजे! इथे चित्र उलटे दिसत्ये, यावर पोळी भाजून घेणारे कधीही लोकहितवादी नसतात. ममतांच्या सरकारने हे ध्यानात ठेवून चिथावणी देणाऱ्यांना अटक केली पाहिजे. निर्दोष जिवांचे खून करणाऱ्यांना, लूटमार करणाऱ्यांना अटक करून कठोर कारवाई केली पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांमधला आपसी सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व सच्चेपणाने केले पाहिजे!






