शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘परख’ ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली. परखने केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील राज्यांनी सहभाग घेतला होता. देशातील राज्यांनी केलेल्या कामगिरीनुसार पंजाब आणि केरळ पहिल्या क्रमांकावर असून, महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. तर इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणानुसार तिसरी इयत्तेनुसार महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असून, इयत्ता सहावी आणि नववी या इयत्तांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.
परख सर्वेक्षण अहवाल जाहीर
चार डिसेंबर 2024 ला परख संस्थेकडून देश पातळीवर शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले होते . या सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरी, सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्रातील 4 हजार 314 शाळांमधील 13 हजार 930 शिक्षक आणि एक लाख 23 हजार 69 विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात भाग घेतला. या सर्वेक्षणातून इयत्ता तिसरी, सहावी आणि नववी या इयत्ता मधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांसाठीचे मूल्यांकन करण्यात आले.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 पेक्षा परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 मध्ये इयत्ता नववीतील गणित विषय वगळता सरासरी संपादणूक यामध्ये तीन टक्के वाढ झाली आहे हे स्पष्ट होत आहे. या सर्वेक्षणात राज्य सरकारच्या शाळांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मात्र एकूण शालेय सुधारणा आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.
तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना
‘परख’ने केलेल्या सर्वेक्षणाच्या विश्लेषणात जाण्यापूर्वी मुळात या सर्वेक्षणाचा आधार काय होता, हे पाहणे महत्त्वाचे. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात, त्यांना शिकवल्या गेलेल्या अगदी मूलभूत संकल्पना किती स्पष्ट झाल्या आहेत, याची पाहणी केली गेली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे भाषा, गणित आणि आपल्याभोवतीचे जग या विषयांवर मूल्यमापन झाले; तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान आणि समाजविज्ञान या विषयांतील आकलनाची परीक्षा घेतली गेली. ज्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले गेले, त्यातील तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांना दीड तास, तर नववीच्या विद्यार्थ्यांना दोन तासांची मूल्यमापन चाचणी द्यायची होती. या मूल्यमापनाचे जे विश्लेषण आहे, त्यातून खरी शिक्षणाची स्थिती स्पष्ट होते.
उदाहरणार्थ, सहावीच्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना पूर्णांकांची तुलना करता आली नाही, तसेच मोठमोठे आकडे समजणे कठीण गेले. मूळ संख्या म्हणजे काय, याबाबतही स्पष्टता नसून ‘सातचे विभाज्य’ वगैरेसारखे प्रश्नही अनेकांना समजले नाहीत. टक्केवारी आणि अपूर्णांक यांसारख्या संकल्पना दैनंदिन आयुष्यात कशा वापरायच्या, याबाबतही सहावीच्या विद्यार्थ्यांत संभ्रम दिसतो. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची विज्ञानातील गतही अशीच. देशभरच्या सुमारे 60 टक्के विद्यार्थ्यांना संपादणुकीची किमान पातळी गाठण्यातही अपयश आले. भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांनुसार पदार्थांमधील फरक ओळखता न येणे, चुंबकाच्या गुणधर्मांचे वर्णन करता न येणे ही त्याची काही उदाहरणे.
राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच
गणितातील संकल्पनांचे आकलन न होणे, हा मोठा चिंतेचा विषय असल्याचे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगत आहेत. सर्वेक्षण केलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करताना अडखळतात, संख्येतील अंकांचे स्थान ओळखणेही अनेकांना जमत नसल्याचे दिसते.
तिसरीच्या 45 टक्के विद्यार्थ्यांना 99 पर्यंतच्या संख्या चढत्या वा उतरत्या क्रमाने लावण्यासारखे प्रश्नही अवघड जात आहेत आणि दोन अंकी संख्यांची वजाबाकीही मोठ्या कष्टाने साध्य होत आहे. भाषा विषयांतही अनेकांची भंबेरी उडाल्याचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. सुमारे 43 टक्के विद्यार्थ्यांना वाचलेल्या उताऱ्यावरून निष्कर्ष काढणे, कल्पनाविस्तार, सारांश लेखन अशा काही बाबी जमत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांची उत्तम कामगिरी
सर्वेक्षणानुसार देश पातळीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर आणि पालघर या जिल्हे इयत्ता तिसरीमध्ये संपादणूक कमी आहे. वर्धा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, गडचिरोली आणि रायगड या जिल्हे इयत्ता सहावीमध्ये मागं आहेत. तर अकोला, नंदुरबार, परभणी, गडचिरोली, आणि मुंबई उपनगर जिल्हे इयत्ता नववीमध्ये मागे आहेत.






