- प्रशांत पवार
कितने बरस लग गए ये जानने में,
मुसहर किसी जाति को नही,
दु:ख को कहते है…
प्रख्यात हिंदी कवी अच्युतानंद मिश्र यांनी बिहारमधील मुसहर समाजाचे नेमक्या तीन ओळींत केलेले हे विश्लेषण...
बिहारमध्ये निवडणूकीचे पडघम वाजू लागले की लगेचच हा मुसहर समाज चर्चेत येतो. पत्रकारांली पावले आणि न्युज चॅनेलचे कॅमेरे चार वर्षाने का होईना त्यांच्या गलिच्छ वस्तीच्या दिशेने वळू लागतात. बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अभिनव पांडेय या पत्रकाराने ‘मुसहर’ याच नावाची एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली आहे, ज्याला अवघ्या आठवड्याभरातच एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. ज्यांच्या आहारात ‘मूस’ म्हणजे उंदीर आहे, तो हा मुसहर.
दलितांमधील दलित, सामाजिकदृष्ट्या शोषित आणि दुर्लक्षित असा हा मुसहर समाज... त्यांच्या या अपिरहार्य जगण्याकडे म्हणूनच देशी-विदेशी मंडळी ‘थ्रिल’ म्हणून बघतात आणि त्यांना यात काहीतरी ‘डिस्कव्हरी’ असल्यासारखं वाटतं. मुसहर समाजावर किंवा त्यांच्या उंदीर खाण्याच्या पद्धतीवर म्हणूनच अनेक विदेशी मंडळींनी डॉक्युमेंट्रीज तयार केल्या आहेत.
उंदीर खाणारी एक ‘तथाकथित’ बदनाम जमात…
बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या भागात संख्येने जास्त असलेल्या मुसहरांना महादलित म्हणून ओळखले जाते. महादलित का तर सवर्णांनी ज्या जातींना अस्प्रुष्य ठरवले त्या दलित जातीदेखील या मुसहरांपासून चार हात लांब राहतात. दलितांमधील दलित, सामाजिकदृष्ट्या शोषित आणि दुर्लक्षीत असा हा मुसहर समाज... हा समाज कितीतरी पिढ्या जमीनदारांच्या शेतांमधले उंदीर पकडणे आणि उंदरांनी बिळामध्ये दडवून ठेवलेले धान्य मिळवणे एवढ्यावरच आपली गुजराण करत आला आहे.
मुसहर जात ही जितकी उंदीर मारणारी जमात म्हणून परिचित आहे, तितकीच उंदीर खाणारी म्हणूनही बदनाम आहे. अलीकडच्या काळात शेतमजुरी हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मात्र अनेकदा मेहताना म्हणून पैसे देण्याऐवजी कांदे बटाटे वा मूठभर धान्य देवून त्यांची बोळवण केली जात आहे. शेतातल्या पीक कापणीनंतर उरलंसुरलं धान्य गोळा करणं आणि जे दाणे उंदीर त्यांच्या बिळात घेऊन जातात तेही बिळात हात घालून गोळा करणं ही मुसहर समाजाची अपरिहार्यता.
शेतातली बिळं शोधायची, त्या बिळांच्या बाहेर जाळ करून आत धुर सोडायचा आणि अलगद हात बिळात घालून उंदीर धरायचा यात मुसहर समाज पटाईत. तोच उंदीर चुलीवर भाजून खायचा किंवा त्याचे बारीक तुकडे करून त्याची भाजी बनवायची... वास्तविक आज अनेकांनी उंदीर खाण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली असली तरी उंदीर खाणारा समाज अशी ख्याती पसरल्याने मुसहरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही.
मुसहर जातीच्या व्युत्पत्तीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एका पुराणकथेनुसार असे मानले जाते की, मुसहर हे राजवंशीय क्षत्रिय कुलातले आहेत. देवाने माणूस जन्माला घातला. त्याला वाहन म्हणून घोडा दिला. त्यावेळी मुसहर जातीतल्या काही लोकांना घोड्यावर मांड कशी ठोकावी आणि घोडेस्वारी कशी करावी हे उमगले. ज्यांना हे उमगले नाही, त्यांनी घोडेस्वारी करताना घोड्याच्या पोटावर मोठे छिद्र करत त्यात आपले दोन्ही पाय ठेवण्यास सुरुवात केली.
संबंधित लेख वाचा: ‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझी यांच्यामुळे बिहारची निवडणूक का तापलीये? |
या प्रकाराने नाराज झालेल्या देवाने समस्त जातीला कायमस्वरुपी दारिद्र्याचा शाप दिला. ही पुराण कथा खरी किती खोटी किती, हा वादाचा मुद्दा असला तरीही, पुराणात शाप म्हणून मिळालेल्या दारिद्र्यापासून मुसहर जातीची अजूनही सुटका झालेली नाही, हे कटू वास्तव आहे. जे कुणालाही नाकारता येणार नाही.
महात्मा गांधींचा चंपारण्य सत्याग्रह आणि मुसहर समाज
दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी पहिला सत्याग्रह बिहारच्या चंपारण्यामध्ये केला होता. नीळच्या त्या सत्याग्रहाला आता शंभरपेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली आहेत. याच सत्याग्रहादरम्यान चंपारण्यातील एका गावात फिरताना गांधीजींच्या नजरेला उघडी-नागडी मुलं, चिंध्यांनी अंग झाकून घेतलेल्या गरीब महिला, डोक्यावर छप्पर नसलेली तोडकीमोडकी घरं आणि एक वेळचे अन्नही ज्यांच्या नशिबात नाही, असा अति मागासलेला समाज दृष्टीस पडला.
हे दृश्य पाहून गांधीजी हळहळले आणि त्यांनी त्याच दिवसापासून आपल्या वस्त्रांचा त्याग करत फक्त ‘पंचा’ वापरून उर्वरित आयुष्य काढले. रिचर्ड ऍटेनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटातदेखील अशा प्रकारचे एक प्रतीकात्मक दृश्य सादर केले आहे. गांधीजी पुढे महात्मा ठरले... जेव्हा समाजातल्या तळातल्या व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होईल तेव्हाच स्वातंत्र्याची खरी चमक दिसून येईल, असे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उद्गार काढले होते.
आज 100 वर्षे झाली... गांधीजींनी पाहिलेल्या त्या अति मागास समाजावर स्वातंत्र्याची किरणे पडलीच नाहीत. आजही चंपारण्यातील त्या गावाला भेट दिली तर उघडी-नागडी मुलं, चिंध्यांनी अंग झाकून घेतलेल्या गरीब महिला, डोक्यावर छप्पर नसलेली तोडकीमोडकी घरं आणि एक वेळचे अन्नही ज्यांच्या नशिबात नाही, असा अति मागासलेला समाज पुन्हा एकदा आपल्या नजरेस पडतो... 15 वर्षांपूर्वी चंपारण्यातील याच गावात 22 जणांच्या भूकबळीची घटना घडली आणि गांधीजींच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला. ‘मुसहर’ हाच तो अति मागासलेला समाज आणि गांधीजींनी चंपारण्यात याच मुसहर समाजातील लोकांच्या वस्तीला भेट दिली होती.
85 टक्के मुसहर समाज संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त
आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न अशा तिन्ही पातळ्यांवर कमालीचा संघर्ष करत असलेल्या या समाजातील जवळपास 85 टक्के लोक कालाजार (जॅपनीज इनसिफिलायटिस), मलेरिया आदी अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांमुळे त्रस्त आहेत. बिहारच्या मुज्जफरनगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत 59 बालके दगावली, परंतु आजपर्यंत डॉक्टरांना ही मुलं कोणत्या रोगामुळे दगावली, हे शोधता आलेले नाही. कदाचित मुसहरांचे गलिच्छ राहणीमान, आहारात उंदराचे आणि डुकराचे मांस आणि हातभट्टीची दारू यापैकी एखादे कारण असावे, असा अंदाज डॉक्टरांनी बांधला आहे.
आजही मुसहर समाजातील साक्षरतेचा दर फक्त 3 टक्के आहे. महिलांमध्ये हाच दर नाममात्र एक टक्का इतकाच आहे. बिहारचे मुख्यमंत्री असताना त्याकाळी लालूप्रसाद यादवांनी एक योजना आखली होती. मुसहर समाजापैकी जो कुणी मॅट्रिक उत्तीर्ण झाला असेल त्याला थेट कारकुनीची सरकारी नोकरी मिळेल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सबंध बिहारमधून केवळ दोनशे मुसहर तरुणांचे अर्ज आले जे मॅट्रिक उत्तीर्ण झाले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये कुपोषणाचे जास्त बळी कुणाचे जात असतील तर ते मुसहर समाजाचे. गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पाहिली की मुसहर समाज कोणत्या अवस्थेत जगतोय, याची कल्पना येऊ शकेल... 1050 महिलांवर बलात्कार, 700 खून, 5000पेक्षा अधिक ऍट्रोसिटीचे गुन्हे आणि 1658 मारहाणीच्या घटना. काही वर्षांपूर्वी बिहारमधल्या जमीनदारांनी पाळलेल्या रणवीर सेनेने मुसहर समाजातील दहा लोकांचे हत्याकांड केले.
पोलिसांची दबंगगिरी तर मुसहर समाजाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अनेक खोट्या आरोपांमध्ये मुसहर लोकांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे. शिवाय गलिच्छ कामं करवून घेण्यासाठी होणारा त्रास वेगळाच. रात्री-बेरात्री मुसहरांच्या वस्तीवर जायचे आणि त्यांच्याकडून बेवारशी, कुजलेल्या-सडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची, पोलिस ठाणे आणि जेलमधील शौचालये साफ करवून घ्यायची आणि मग मोबदला मागितला की पेकाटात लाथ हाणून आयमायचा उद्धार करत हाकलवून द्यायचे, हा पोलिसांचा ‘खेळ’ बनला आहे.
आता उंदीर खाणं सोडलयं, तरीही…
मुसहर जात ही जितकी उंदीर मारणारी जमात म्हणून परिचित आहे, तितकीच उंदीर खाणारी म्हणूनही बदनाम आहे. अनेकांनी आता उंदीर खाणं सोडून दिले आहे. आता केवळ मुंगेर, लखीसराई अशा मोजक्याच जिह्यांत ही प्रथा आढळते. पण उंदरांचे भक्षण करणे ही कुणा एका जातीची खाद्यसंस्कृती नाही. छत्तीसगढपासून झारखंडपर्यंतच्या क्षेत्रात विखुरलेल्या आदिवासींच्या अनेक जमातींमध्ये आणि महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या अनेक जातींमध्ये उंदीर खाण्याची प्रथा आढळते.
एकीकडे विशिष्ट जीवनपद्धतीमुळे बदनाम झालेले मुसहर डुक्कर पाळण्यापासून दगड फोडण्यापर्यंतची कामे करत असतात. अलीकडच्या काळात शेतमजुरी हे अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. मात्र अनेकदा मेहनताना म्हणून पैसे देण्याऐवजी कांदे बटाटे वा मूठभर धान्य देऊन त्यांची बोळवण केली जात आहे.
शिक्षणाच्या बाबतीत चिंताजनक मागासलेपण अनुभवणाऱ्या मुसहर जातीमध्ये असाही एक समज प्रचलित आहे की, विटा-सिमेंटच्या घरात राहणे ही एक अशुभ बाब आहे. याचमुळे गावागावांमध्ये इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे तयार होऊनही मुसहर मात्र त्यात राहण्यास नकार देत आले आहेत. या अनिष्ट परंपरेला चिकटून राहिल्यानेच आजवर अनेकदा नैसर्गिक आपत्तीप्रसंगी स्वत:चा बचाव करणे त्यांना अवघड गेले आहे. जग गगनचुंबी इमारतीत ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत असताना परंपरागत पद्धतीची माती-चाऱ्याची घरेच मुसहर जातीतल्या लोकांच्या जीवनपद्धतीचा भाग होऊन राहिली आहेत.
नवीन कपडे घालण्याचा क्षण मुसहरांच्या आयुष्यात फक्त दोनदा येतो. पहिला लग्नाच्या वेळी आणि नंतर मेल्यानंतर. या दोन प्रसंगांव्यतिरिक्त कधी कोणत्या मुसहराने नवीन कपडे घातल्याचे उदाहरण नाही. जर एखाद्याने नवीन कपडे घातलेच तर गावातल्या इतरांनी त्यांच्याकडून घाणेरडी कामे करून घेतलीच म्हणून समजा, जेणेकरून त्यांचे कपडे पुन्हा एकदा गलिच्छ होतील... उंदीर खाणे, तोडक्या-मोडक्या झोपडीत राहणे आणि आयुष्यात फक्त दोनदाच नवीन कपडे घालणे या मूलभूत गरजांच्या पाठीमागे मुसहरांच्या अंधश्रद्धा आणि पौराणिक कथांचा प्रभाव असल्याचे पसरवले जात असले तरी ते तितकेसे खरे नाही. अपरिहार्यता हे एकमेव कारण मुसहरांच्या बाबतीत लागू पडते.
‘हमारे हाथ मे अब चुहा नही, ‘माऊस’ चाहिये’
बिहारमध्ये मुसहरांची संख्या पन्नास लाखांपेक्षा अधिक... उत्तरप्रदेशमध्ये हा समाज दहा लाखांपेक्षा जास्त... इतक्या मोठय़ा संख्येने असल्यामुळे साहजिकच मुसहर समाजाकडे कोणाचे लक्ष गेले असेही नाही. बिहारच्या समाजकल्याण खात्याचे प्रधान सचिव विजय प्रकाश यांनी काही वर्षांपूर्वी मुसहरांच्या उन्नतीसाठी एक अभिनव प्रयोग राबविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र त्यांच्या या प्रस्तावावर बिहारमध्ये इतका मोठा गहजब उडाला की, तो प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवावा लागला. यापुढे बिहारच्या हॉटेलांमध्ये उंदरांच्या मांसाच्या वेगवेगळ्या ‘डिशेस’ मिळतील, अशी जबरदस्त घोषणा विजय प्रकाश यांनी केली आणि बिहार हादरलाच. मुसहरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर ज्याप्रमाणे कुक्कुटपालन, वराहपालन योजना राबविल्या गेल्या, त्याच धर्तीवर उंदीरपालन योजना राबविणे गरजेचे आहे.
सर्व्हे आणि स्थानिक पातळीवर अभ्यास केल्यानंतर या प्रकल्पामुळे मुसहरांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर निश्चितच वाढू शकेल, असा विजय प्रकाश यांचा दावा होता आणि यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली होती. या योजनेचा दुहेरी लाभ होऊ शकतो. एकतर अन्नधान्याच्या गोदामामध्ये उंदरांच्या उपद्रवामुळे 50 टक्के धान्यांची नासाडी होते, ती रोखू शकू आणि दुसरे समाजातील जो सगळ्यात शेवटचा घटक म्हणून जिणं जगतोय त्या मुसहरांचीही उन्नती होऊ शकेल. उंदराचे मांस हे खायला लज्जतदार तर असतेच शिवाय त्यात प्रोटीन्सही असतात, असे सांगून विजय प्रकाश यांनी थायलंड आणि फ्रान्सचे त्यासाठी उदाहरण दिले.
उंदरामध्ये हाडांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे त्याचे मांस पचायलाही खूप सहज असते. त्यामुळे माझ्याकडे उंदराच्या मांसाच्या वेगवेगळ्या रेसिपीज असल्याचेही त्यांनी सांगितले होते. बिहार आणि उत्तरप्रदेशमधील हायवेवर असलेल्या अनेक ढाब्यांमध्ये उंदराचे मांस मिळते... ‘पातल-बगेरी’ या नावाने मिळणारी ही डिश लोकं चवीने खात असतात, असे विजय प्रकाश यांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले होते.
विजय प्रकाश यांनी जेव्हा ही क्रांतिकारी योजना सादर केली, तेव्हा बिहारमध्ये अक्षरश: राडा झाला. स्वत: मुसहर समाजानेदेखील या प्रस्तावाला विरोध केला. आमच्या पिढ्यानपिढ्या याचमुळे बरबाद झाल्या आणि आताही पुढे हेच करत बसायचे का, असा सवाल करत ‘हमारे हाथ मे अब चुहा नही, ‘माऊस’ चाहिये’, अशी भूमिका मुसहरांनी त्या वेळी घेतली.
बिल गेट्स म्हणाले, ‘ओ गॉड, हे लोक कसे राहतात’?
आज बिहारच्या विधानसभेत मुसहर समाजाचे मुख्यमंत्र्यांसह आठ आमदार आहेत. कुपोषणाचे बळी ठरल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, मानवाधिकार आयोग, अनेक एनजीओ यांच्याबरोबरीने बिहारचे प्रशासन मुसहर समाजाच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्न करीत आहेत. काही वर्षांपूर्वी बिल गेट्स स्वत: डोंगर-नद्या पार करून मुसहर लोकांच्या वस्तीवर गेले होते. मुसहरांची केविलवाणी अवस्था पाहिल्यानंतर ‘ओ गॉड, हे लोक कसे राहतात’ असे उद्गार त्यांनी काढले होते. त्या वेळी बिल गेट्सच्या गेट्स फाऊंडेशनने मुसहर वस्तीचे एक सबंध गाव दत्तक घेतले होते.
महादलित मुसहर समाजासाठी बिहार प्रशासन घेत असलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल योजना, प्रत्येकाच्या घरात 400 रुपयांचा एक रेडिओ, प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आणि गणवेश विकत घेण्यासाठी 500 रुपये, पुरुष आणि स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण, अंत्यविधीसाठी दीड हजार रुपये, महिला बचत गट योजनेसाठी प्रोत्साहन, 250 लोकांची वस्ती असलेल्या गावासाठी पक्का रस्ता, मुसहर विद्यार्थिनींसाठी हॉस्टेल आणि घरकुल योजनेंतर्गतच शौचालय बांधण्यासाठी 300 रुपये…
इतके असले तरी यापैकी एकही योजना मुसहरांपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासन आणि मुसहर यांच्यामध्ये जी सामाजिक व्यवस्था आहे, तीच मुसहरांचा सर्वनाश करत आहे. सामंतशाही-जमीनदारी, पोलिसांची दबंगशाही, सरकारी योजनेतील दलाल आणि उच्चवर्णीयांची हुकूमशही यांच्या कचाटय़ात सापडलेला मुसहर पार पिचून गेला आहे. मुसहरांच्या वस्तीवर कित्येक वर्षांपासून विजेचे खांब लावले आहेत, परंतु विजेचा पत्ता नाही.
अशा वेळी शासकीय योजनेतून मिळणारा रेडिओ काय कामाचा? घरकुल योजनेंतर्गत घरे तर बांधली; मात्र प्रशासनाची पाठ वळताच व्यवस्थेने या घरांवर पेटते बोळे टाकून पेटवून देण्यात आली... शेतीसाठी प्रशासनाने जमीन तर दिली, मात्र जमीनदारांनी त्या शेतीवर कब्जा मिळवला... शिक्षणाची गोडी लागण्यासाठी मध्यान्ह भोजन योजना राबवली, परंतु मुलं फक्त शाळेत जेवणापुरतीच जाऊ लागली. एकदा का जेवण झाले की लगेच रोजंदारीवर कामे करण्यासाठी गेली घमेली उचलायला... मनरेगासारख्या योजनेत काम करायचे म्हटले तर मुसहर समाजाच्या 65 टक्के लोकांकडे जॉब कार्डच नाही…
किराई मुसहर... मुसहर समाजाचे पहिले खासदार, पण आजही
मुसहर समाजात चार महनीय व्यक्ती होऊन गेल्या. या चारही व्यक्ती प्रकाशझोतात आल्या... ‘न्यूज मेकर्स’ ठरल्या... मात्र तरीही त्यांचा समाज आजही आहे तिथेच आहे. कारण त्यांच्या नावातच त्यांच जगणं समावलेलं आहे!
किराई मुसहर... बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील मुरहो नावाचे एक छोटेसे गाव... स्वतंत्र भारतात 1952 साली जी पहिलीच लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीत याच गावातले किराई मुसहर हे ‘मुसहर’ समाजाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले. आज ते हयात नाहीयेत परंतु त्यांचे नातू आणि इतर कुटुंब याच गावात राहतात. परिस्थिती आज अशी आहे की, इतक्या वर्षानंतरही या गावात पक्का किंवा कच्चा रस्ता सोडा साधी पायवाटही नाही.
आजही या माजी खासदाराचे घर बांबूच्या झोपडीचे आहे आणि आजही या घरातल्या बायका शौचालयासाठी उघड्या माळरानावरच जातात. देशातले पहिले खासदार असूनही गावाने किराई मुसहर यांची एकही आठवण जतन करून ठेवलेली नाहीये. त्याउलट याच गावातल्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांचे मात्र गावाने स्मारक बांधले आहे. कारण हे तेच बी.पी. मंडल आहेत ज्यांच्या मंडल आयोगामुळे सबंध भारत ढवळून निघाला. मुरहो हे गाव आता किराई मुसहरांचे म्हणून नव्हे तर बी.पी. मंडल यांच्या नावामुळे ओळखले जाते.
(माऊंटन मॅन म्हणून परिचित असलेले दशरथ मांझी मुसहर.)
दशरथ मांझी मुसहर.. द माऊंटन मॅन
दशरथ मांझी मुसहर ... मुघल बादशहा शहाजहाँशी ज्याची तुलना केली जाते ते दशरथ मांझी हे मुसहर समाजाचे. आपल्या मुमताजसाठी शहाजहाँने ताजमहाल बांधला. साठच्या दशकात बिहारच्या दशरथ मांझीने आपल्या पत्नीसाठी केवळ छिन्नी आणि हतोडा घेऊन सबंध आयुष्य डोंगर फोडून रस्ता तयार करण्यात घालवले.
गया जिल्ह्यातील गेहलोर गावातल्या एका भल्यामोठ्या डोंगरापलिकडे दशरथ लाकडं आणण्यासाठी गेला होता आणि आपल्या नवऱ्यासाठी जेवण घेऊन जाणारी त्याची पत्नी त्याच डोंगराच्या दरीत कोसळून गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती, परंतु रुग्णालय तेथून 70 किमी अंतरावर होते आणि मधोमध भलामोठा डोंगर होता. वैद्यकीय उपचार न झाल्यामुळे अर्थातच दशरथच्या पत्नीने प्राण सोडले. गावात येण्या-जाण्यासाठी रस्ता असता तर ही घटना घडली नसती ही बाब दशरथला सलत होती. त्याने छिन्नी-हतोडा घेतला आणि तब्बल 22 वर्षापर्यंत तो डोंगर फोडत राहिला.
50 किलोमीटरचे ते अंतर दशरथच्या अवरित परिश्रमामुळे 10 किलोमीटरचे झाले आणि दशरथचे स्वप्न पूर्ण झाले. दशरथचा सन्मान करण्यासाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दशरथला ‘एक दिवसाचा मुख्यमंत्री’बनवले होते. दशरथच्याच आयुष्यावर प्रख्यात सिनेदिग्दर्शक केतन मेहता याने ‘द माऊंटन मॅन’नावाचा चित्रपट तयार केला, ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकीने प्रमुख भूमिका साकारली. संवेदनशिल आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते सिझन 2’ ची सुरुवातही दशरथ मांझीच्या या घटनेने झाली होती. स्वत: आमीरने दशरथच्या गावाला भेट दिली होती. दशरथ मांझीचे आयुष्य इतके प्रकाशझोतात येऊनही आज त्याच्या कुटुबिंयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मनोजकुमार मांझी मुसहर... ‘केबीसी’मध्ये 25 लाख जिंकला, पण…?
मनोजकुमार मांझी मुसहर... बिहारच्या दानापूर येथील जमसौत गावचा मुसहर समाजाचा हा 23 वर्षांचा मुलगा कौन बनेगा करोडपतीच्या हॉटसीटवर बसला आणि चक्क 25 लाख रुपये जिंकला. रातोरात स्टार झालेल्या मनोजकुमारच्या झोपडीबाहेर राजकीय नेत्यांची, प्रसारमाध्यमांची, सामाजिक कार्यकत्यांची झुंबड उडाली. वडील शेतमजुर आणि आई अंगणवाडी शाळेत स्वयंपाकाचे काम करणारी. सात महिन्यांपासून पगार नाही, वडलांना मजुरी मिळेलच याची शाश्वती नाही. दोनवेळच्या जेवणाची बोंब... हॉटसीटवर बसल्यानंतर जेव्हा ‘केबीसी’ने मनोजच्या गावातली आणि त्याच्या कुटुंबाची विदारक स्थिती दाखवली तेव्हा ‘बिग बी’सह सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
अशा परिस्थितीत मनोजकुमारने अमिताभ बच्चनकडून 25 लाखांचा धनादेश स्वीकारला तेव्हा मनोजचे इंजिनिअर बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु 25 लाख तर सोडा जिंकलेल्या या रकमेपैकी 25 रुपयेदेखील मनोजकुमारला मिळाले नाहीत. मनोजची जेव्हा केबीसीसाठी निवड झाली तेव्हा तो जी काही रक्कम जिंकेल ती ज्या शोषित समाधान केंद्रात मनोज शिकत होता त्या केंद्राच्या विकासासाठी देणगी म्हणून द्यायची हे अगोदरच ठरले होते आणि त्यानुसार मनोजला पूर्ण रक्कम केंद्राला द्यावी लागली. लखपती मनोजचे कौतुक करण्यासाठी लोकांच्या घरी रांगा लागलेल्या होत्या. परंतु मनोजच्या आईला त्यांचे तोंड गोड करण्यासाठी हातावर साधी साखरही ठेवता आली नाही. केबीसी जिंकून आज वर्ष उलटत आले, मनोजच्या कुटुंबाची परिस्थिती आजही जैसे थे अशीच आहे.
(मुसहर समाजाचे पहिले मुख्यमंत्री जितन राम मांझी.)
जीतानराम मांझी मुसहर… मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊनही?
जीतान राम मांझी मुसहर... लोकसभा निवडणुकीच्या पडझडीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आणि त्या खुर्चीवर विराजमान झाले मुसहर समाजाचे नेते जीतनराम मांझी... जीतनराम यांचे मुख्यमंत्री बनणे ही घटना मायावतींनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याइतकीच महत्त्वाची आहे. बिहारच्या गया जिल्ह्यातील खिजरसराय येथील महकार गावात जन्मलेले जीतनराम कैकवेळा आमदार राहिले आहेत. नितीश कुमार सरकारमध्ये ते कॅबिनेटमंत्री होते. बिहार सरकारमध्ये जीतनराम यांच्यासह एकूण आठ आमदार मुसहर समाजाचे आहेत.
मात्र जीतनराम माझी यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याने मुसहर जातीतील लोकांसाठी संधीचे दार किलकिले झाले होते. मात्र तरीही महादलित होण्याचा फटका त्यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसतानाही पडला होता. मांझी राज्याच्या मधुबन जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये दर्शनाला गेले होते. मात्र दर्शन झाल्यानंतर जेव्हा ते तेथून निघून गेले तेव्हा ग्रामस्थांनी मंदिर धुवून काढून त्याचे शुद्धीकरण केले. समाजाच्या तळागाळातून येऊन बिहारच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या मांझी यांची ही कहाणी, अनेक अपमानांमध्येही टिकून राहिलेल्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे.
बिहारचे राजकारण आणि मुसहर समाज
युपी-बिहार हे भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहे किंवा ते तसे राहावे याचसाठी राममनोहर लोहिया, व्ही. पी. सिंग, कांशीराम, मायावती, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार, मुलायमसिंग यादव यांसारख्या नेत्यांनी तशी आखणी केली. त्यांच्या सगळ्या मोहिमा या जरी दलित आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठीच्या होत्या तरी त्या पूर्णपणे राजकीय स्वरूपाच्या होत्या. कॉँग्रेस हा जमीनदारांचा पक्ष असल्याचा आरोप करून लोहियांनी सत्तेत दलित-इतर मागासवर्गीयांसाठी हक्क मागितला.
‘पिछडा पावै सौ में साठ’ ही घोषणा लोहियांनी लोकप्रिय केली. पुढे लोहियांचा हाच कित्ता समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी आणि जद(यु) यांनी गिरवला. लालूप्रसाद यादव यांनी ‘भूरा बाल साफ करो’ (भूमिहार, राजपूत, ब्राह्मण आणि लाला) अशी तर कांशीराम-मायावती यांनी ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ (ब्राह्मण, वैश्य आणि राजपूत) ही घोषणा लोकप्रिय केली.
सांगायचा मुद्दा हा की, राजकीय परिवर्तन या मुद्यांभोवती लोहिया आणि त्यांच्या चेल्यांची चळवळ फिरत राहिली आणि त्या तुलनेत युपी-बिहारमधील सामाजिक परिवर्तन जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, त्यात हे सगळे कमी पडले. याच्या नेमके उलट महाराष्ट्र आणि दक्षिणेकडे घडले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियर आणि नारायण गुरू यांच्या विचारांमुळे आपल्याकडे आणि दक्षिणेत खूप मोठय़ा प्रमाणावर सामाजिक परिवर्तन होऊ शकले आणि साहजिकच त्याचे पडसाद राजकीय पटावरही उमटले.
आजही युपी-बिहारमध्ये ‘जाता जात नाही ती जात’ या शोकांतिकेमागे तिथे सामाजिक परिवर्तन घडू शकले नाही, हेच एकमेव कारण आहे. ‘मुसहर’ समाज हे त्याचेच द्योतक आहे. जोपर्यंत फुले-आंबेडकर-पेरियार यांचे विचार तळागाळापर्यंत रुजणार नाहीत तोपर्यंत ‘कही यह मुसहर होने का दण्ड तो नही’ या मानसिकतेखाली जगत असलेल्या मुसहरांना या दुष्टचक्रातून बाहेर काढणे कठीण आहे.






