सुमित्रा वसावे (नंदुरबार)
धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबालहोजळ्या पाडा येथे डाकीण असल्याचा संशयावरुन एका 65 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेत वृद्ध महिलेची हत्या करून पसार झालेल्या संशयित आरोपी महिलेला म्हसावद पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार धडगाव तालुक्यातील मोडलगाव गुंबालहोजळ्या पाडा येथे राहणाऱ्या काल्लीबाई ओल्या तडवी (वय 65) यांच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांची मुलगी खारकी ही कुटुंबासोबत मजुरीसाठी पंढरपूर (जिल्हा सोलापूर) या भागात गेली आहे. यामुळे काल्लीबाई घरी एकट्याच होत्या. त्याच गावातील समका नारसिंग तडवी वारंवार आजारी पडत होते.
काल्लीबाई या डाकीण असल्याचा संशय घेत त्या जादूटोणा करीत असल्याने समका नारसिंग तडवी वारंवार आजारी पडत होते, असा समज झाला. मुलगी घरी नव्हती. यावेळी काल्लीबाई या घरात एकट्या होत्या. यादरम्यान 8 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काल्लीबाई या त्यांच्या राहत्या घरातील खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्यावर कुठल्या धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
संशयित समकाबाई हिने मयत काल्लीबाई यांना यापूर्वी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी, काकरपाटी उमरीमाळ पाडा येथील भीमसिंग हांद्या वसावे यांच्या फिर्यादीवरून समका नारसिंग तडवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या नंतर म्हसावद तालुका शहादा पोलिस ठाण्याच्या पथकाकडून संशयित महिलेचा शोध सुरु होता.
हा खून गावातीलच समका नारसिंग तडवी (वय 60) हिने केल्याचे समोर आले होते. या वृद्ध महिलेचा खून करून पसार झालेल्या या महिलेस म्हसावद पोलिसांनी धडगाव तालुक्यातून 11 नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत, अशी माहिती आहे.
नंदुरबारमध्ये डाकीण प्रथा आजही अस्तित्वात
नंदुरबार जिल्ह्यात गावातील एखाद्या महिलेला डाकीण ठरवून अनन्वित अत्याचार करण्याची प्रथा अस्तित्वात आहे. अवघे जग २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना आणि महिलांना जवळपास सर्वच क्षेत्रात समान संधी उपलब्ध होत असताना शिक्षणात बराच पिछाडीवर असणारा आदिवासी बांधव अद्याप वेगवेगळ्या अंधश्रद्धेत गुरफटला आहे. त्यातील डाकीण ठरविण्याची प्रथा म्हणजे क्रूरतेचा कळसच.
सुशिक्षितांचे प्रमाण कमी असल्याने गावकऱ्यांच्या डोक्यात ही अंधश्रद्धा अशी काही भिनली आहे की, ते कोणाचे ऐकण्यास तयार होत नाहीत. एखाद्या गावात काही विपरीत घटना घडल्यास गावकऱ्यांचे अकलेचे तारे तोडण्याचे काम सुरू होते. एखाद्या कुटुंबातील सदस्य एकसारख्या आजारांनी आजारी पडण्याचे कारणही त्यांना पुरेसे ठरते.
या कुटुंबीयांमार्फत वैद्यकीय सल्ला घेण्याऐवजी मांत्रिक अर्थात भगताकडे धाव घेतली जाते. त्याच्यासमोर सर्व घडामोडींचा वृत्तान्त मांडला जातो. या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रमुख घटक कोणी असेल तर तो हा मांत्रिक. कारण, हा मांत्रिक गावातील एखाद्या महिलेकडून या घटना घडत असल्याचे सांगतो. कशाला कशाचा आधार नसताना मांत्रिकाकडून विपरीत घडलेल्या घटनांचा दोष एखाद्या महिलेवर टाकला जातो.
महत्त्वाची बाब म्हणजे, मांत्रिक त्या महिलेचे नाव काही केल्या सांगत नाही. अंदाजपंचे काही ठोकताळे मांडून संबंधित महिलेच्या घराजवळील खाणाखुणा जमलेल्या गावकऱ्यांना सांगतो. हे आडाखे ज्या महिलेशी जुळतात, त्या स्त्रीवर डाकीण असल्याचे शिक्कामोर्तब केले जाते.
मांत्रिकाकडून ही तथ्यहीन प्रक्रिया पार पाडली गेली की, अंधश्रद्धा टोकाला जाण्यास सज्ज होते. डाकीण ठरविलेली महिला आर्थिक दुर्बल घटकातील असते. गावकऱ्यांचा प्रतिकार करण्याइतकी तिच्यात क्षमता नसते. आजवर डाकीण ठरविल्या गेलेल्या महिलांच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकल्यास हीच बाब लक्षात येते.
या महिलेचे हरप्रकारे शोषण केले जाते. मारहाण, शिवीगाळ, गावातून बहिष्कृत करून हकालपट्टी, कुटुंबातील सदस्यांना शक्य तितका त्रास देण्याचे सत्र सुरू होते. आपण डाकीण नसल्याचा टाहो संबंधित महिला फोडत असली तरी तिच्या आर्जवाकडे कोणी लक्ष देत नाही. अनेकदा कोणाच्या नजरेसमोर यायचे नाही म्हणून तिच्यावर बंधने लादली जातात. परिणामी, कित्येक महिलांवर या शोषणात गाव सोडून परागंदा होण्याची वेळ आली आहे. कित्येकींना प्राणदेखील गमवावे लागले.
काय आहे शिक्षा?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नंदुरबार जिल्ह्यात डाकीण प्रथा विरोधी परिषदा, संवाद यात्रा भरवण्यात आल्या. पोलीस विभागाच्याही काही मोहिमा झाल्या. सरकार, प्रशासनानं डाकीण प्रथा संपवण्याचे थोडे फार प्रयत्नही केले. पुढे 2013 ला महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि जादुटोणा विरोधी कायदाच आला. त्यातल्या सहाव्या आणि सातव्या अनुसूचीप्रमाणे, एखादी व्यक्ती करणी करते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते, तिच्यामुळे रोगराई पसरते, कोणाला खाते असं म्हणणं, चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं, नग्न धिंड काढणं किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणं गुन्हा असल्याचं म्हटलं गेलं. गुन्हा करणाऱ्याला सात वर्षांपर्यंत कारावास आणि 50,000 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठरली.






