- शुभांगी मिश्रा
छत्तीसगढच्या नरहरपूर येथील घनदाट जंगलाच्या मधोमध सिमेंटच्या भिंतीचे एक छोटेसे कार्यालय आहे आणि त्याच्या दरवाज्यावर लिहिलं आहे… नवीन शवगृह! म्हणजे मृतांचे घर… गेल्या दोन दशकांपासून या शवागरामध्ये 1200 पेक्षा अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन म्हणजे पोस्टमार्टम झालं आहे. या कार्यालयामध्ये मृतदेहाला फाडणे आणि पुन्हा शिवणे असं काम चालतं आणि हे काम करते संतोषी दुर्गा नावाची एक महिला. तसं बघायला गेलं तर संतोषीकडे पोस्टमार्टम करण्याची कोणतीही अधिकृत पदवी नाही किंवा तिला त्याचे प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही. मात्र तिच्याकडे एकच गोष्ट आहे ज्यामुळे संतोषीला मृतदेह फाडावे लागतात आणि ती म्हणजे तिची जात… संतोषी ही मागासवर्गीय असून ती एक सफाई कर्मचारी आहे.
या अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या शवागरात पाणी नाही, वीज नाही. आहे तो फक्त सिमेंटचा एक मोठा कट्टा ज्यावर मृतदेह ठेवण्यात येतो आणि वेगवेगळ्या आकाराच्या चाकूंचा एक संग्रह. आजूबाजूची लोकं म्हणतात, या जागेत भूतं राहतात आणि जागेला शाप मिळाला आहे. म्हणूनच 42 वर्षाच्या संतोषी दुर्गालादेखील गावातील लोकं संशयाच्या नजरेने बघतात, तिच्यापासून चार हात लांब राहतात, तिलाा डायन म्हणून टोमणे मारतात. संतोषीला या सगळ्याशी काहीही घेणंदेणं नाही कारण तिच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. दलित असल्यामुळेच तिच्यावर हे घाणेरडं आणि न आवडणारं काम सोपविण्यात आलं आहे.
‘’मी मृतदेहांची चिरफाड करते म्हणून मला लोकं डायन म्हणतात…’’
नरहरपुर सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात काम करणारी संतोषी म्हणते,’’लोकांची अशी समजूत आहे की शवागर हे अशुभ असतं, त्यामुळे त्यांनी अगोदर गावात असणारं हे शवागर रुग्णालयावर दबाव टाकून जंगलात हलवलं.’’
या शवागरात संतोषी एक बदली कामगार म्हणून काम करते. बदली कर्मचारी ते असतात जे सरकारच्या नियमित सेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करतात आणि सरकारी सफाई कर्मचारी ते असतात ज्यांना ही घाणेरडी कामं कराला आवडत नाही. हे बदली कामगार कधी रस्ते झाडतात, कधी गटारं साफ करतात आणि संतोषीसारखे काही बदली कामगार डॉक्टरांना न आवडणारी कामं जसे की मृतदेहाचे विच्छेदन करणं अशी कामं करतात. बदली कामगारांना नियमित कामगारांप्रमाणे वेतन आणि अन्य सुविधा मिळत नाही.
सबंध भारतात मग ते नरहरपुर असो, गुरुग्राम, धारवाड असो किंवा दिल्ली असो… हजारो दलित सफाई कामगारांना जबरदस्तीने पोस्टमार्टमचं काम करण्याची सक्ती केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात त्यांना ‘कटर’ असं म्हटलं जातं. या कामासाठी ना पुरेसं प्रशिक्षण असतं, ना सुरक्षा उपकरण, ना मान्यता आणि ना अतिरिक्त श्रमाचा मोबदला…
सरकारी नियमांनुसार शवविच्छेदन करण्यासाठी एमबीबीएसची पदवी ही किमान पात्रता असली तरी, बहुतेक डॉक्टर कुजलेल्या मृतदेहांजवळ किंवा त्यांच्या अवयवांजवळ जाऊ इच्छित नाहीत. ते दूरवरून निरीक्षण करू शकतात, परंतु प्रत्यक्षात विच्छेदन दलित सफाई कर्मचाऱ्यांवर सोडले जाते. पिढ्यानपिढ्या हाच प्रकार सुरू आहे म्हणूनच मृतदेहांची चिरफाड करण्याच्या कामाकडे जातीच्या अंगाने पाहिलं जातं, या कामाला कलंकित नजरेनं पाहिल जातं आणि या कामाला घृणास्पदरित्या पाहिलं जातं.
"ही पद्धत तर हाताने मैला साफ करण्यापेक्षाही वाईट आहे,"
"ही पद्धत तर हाताने मैला साफ करण्यापेक्षाही वाईट आहे," असे सफाई कर्मचारी आंदोलनाचे निमंत्रक बेझवाडा विल्सन म्हणतात. सफाई कर्मचारी केवळ पूर्वसंमतीशिवाय धोकादायक आणि मानसिकदृष्ट्या घाणेरडं काम करत नाहीत तर आठवड्यातून सातही दिवस काम करावे लागणाऱ्या अस्थिर कंत्राटी कामांमध्ये देखील ते अडकले आहेत. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते मृतांच्या नातेवाईकांच्या टिप्सवर अवलंबून असतात.
संबंधित लेख वाचा: 1) आदिवासी-दलित मुली NEET उत्तीर्ण झाल्या, हार-तुरे घातले गेले… पण आता ‘मेडिकल’ची फीस भरायला लाखो रुपये आणायचे कुठून? |
दुर्गासाठी, शवागर हे काही नवीन ठिकाण नाही. तिने तिच्या वडिलांकडूनच मृतदेह फाडण्याचं काम शिकलयं. मृतदेहाची चिरफाड करताना कायम दारूच्या नशेत असणाऱ्या आपल्या वडिलांचा मृत्यू संतोषीने आपल्या डोळ्यांसमोर पाहिलाय. ती म्हणते,’’माझे वडील अगदोर इथेच पोस्टमार्टम करायचे, पण हे आव्हानात्मक आणि घाणेरडं काम करण्यासाठी त्यांना कायम दारू लागायची. मी मात्र हे सिद्ध करून दाखवलं की दारूशिवाय देखील हे काम करता येऊ शकतं…’’
डॉक्टरांचे काम करतात दलित सफाई कामगार…
आसाम राज्याच्या सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य आणि स्वत: एका पोस्टमार्टम करणाऱ्या कुटुंबातून येणारे भीम बसफोर म्हणतात की, या देशात एकही पोस्टमार्टम हे दलित सफाईकर्मीशिवाय होत नाही. कुणालाही हे काम करायचं नाहीये आणि म्हणूनच सफाई कामगारांवर हे काम लादण्यात आलं आहे. सफाई कामगार तीन प्रकारचे असतात, रस्त्यांवर काम करणारे, मैला साफ करणारे आणि तिसरे मृतदेह फाडणारे… या तिसऱ्या कामाबाबत लोकांमध्ये अद्याप जागरुरकता निर्माण झालेली नाही.
संतोषी दुर्गाकडे पोस्टमार्टमसाठी फक्त एक हतोडा आणि काही ब्लेड आहेत, ज्यांना तिने एप्रन, मास्क आणि ग्लोव्ह्जसोबत एका स्वच्छ बॅगमध्ये ठेवलं आहे. तिला हेदेखील माहीत नाही की, बोन सॉ (हाडं कापण्याची करवत) रिब शीयर (बरगड्या कापण्याचे हत्यार) किंवा विशेष पोस्टमार्टम चाकू कशाला म्हणतात. तिचे हे विशेष टूल्स नरहरपुर सामुदायिक स्वास्थ्य केंद्राच्या एका कोपऱ्यात ठेवलं जात, ज्यावर “खतरा” (Hazardous) असा इशारा लिहिलेला आहे. जेव्हा या टूल्सना घेऊन बाहेर जायचं असेल तर एका साध्या प्लास्टिकच्या डब्यात टाकून ती मोठ्या रुग्णालयात जात असते.
‘’डॉक्टर कधीही मृतदेहाला हात लावत नाही, ते मला सांगतात…’’
जेव्हा एखादा सडलेला, गळलेला मृतदेह येतो किंवा खुन आणि आत्महत्या झालेल्या मृतदेहाचे विच्छेदन करायचं असतं तेव्हा डॉक्टरच नव्हे तर पोलीसदेखील संतोषीला पाचारण करण्यात येतं. मृतदेह कितीही किळसवाणा असला तरी तिला ते काम करावचं लागतं. या मृतदेहात किडे वळवळत असतात, काही शरीर प्रचंड फुगलेले असतात आणि त्यातून अतिशय घाणेरडी दुर्गंधी येत असते, काही प्रेत तर इतके विद्रुप असतात की त्यांची ओळखही सहजासहजी होत नसते, परंतू संतोषीसोमर ते काम करण्यावाचून इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो.
ती सांगते की, राज्य सरकारकडून मला दर तीन महिन्यांनी हेपेटाइटिसची लस दिली जाते. डॉक्टर कधीही मृतदेहाला हात लावत नाही. ते फक्त नोट्स लिहितात. त्यामुळे आता माझ्याकडे पुरेसा अनुभव आहे. शरीर कसं फाडायचं आणि कवटी कशी उघडायची हे मला आता चांगलं जमायला लागलयं. आता मीच डॉक्टरांना सांगते की कुठे हाड तुटलयं आणि कुठे जखमा झाल्या आहेत.’
गुजरातचे वरिष्ठ फॉरेंसिक पॅथोलॉजिस्ट यांनी माहिती दिली की मृतदेह चिरण्याचे काम एकटी व्यक्ती करू शकत नाही, त्या व्यक्तीला मदतनीसाची गरज लागतेच. यावरून हे तर स्पष्ट होतं की जेव्हा डॉक्टर पोस्टमार्टम करतात किंवा प्रेताचं निरीक्षण करतात तेव्हा मदतनीस म्हणून हे ‘कटर्स’ लागतातच. इथेच जातव्यवस्थेला खतपाणी मिळतं. मुख्य भूमिकेत डॉक्टर असतो आणि घृणास्पद कामासाठी दलिस सफाई कामगार…
शवागर कर्मचारी असे कुठलेही पद नाही, त्यामुळे दलितांनाच…
चतुर्थश्रेणी कमचाऱ्यांमार्फत पोस्टमार्टम करणं ही आपल्या व्यवस्थेमधील त्रुटी आहे हे डॉक्टरांनादेखील मान्य आहे, मात्र भारतात शवागरांमध्ये काम करण्यासाठी योग्य कर्मचारी (Mortuary Attendant) मिळतच नाहीत यावरदेखील डॉक्टर जोर देतात. कर्नाटकातील मणिपाल विश्व विद्यापाठी आणि पौंडेचरी येथील जेआईपीएमईआर मध्ये आता शवागर कर्मचारी (Mortuary Attendant) असा एक कोर्स सुरू करण्यात आला असला तरी या कोर्सचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे.
भारतीय अकादमी ऑफ फॉरेंसिक मेडिसिनचे महासचिव डॉ. राजेश डेरे सांगतात की, ‘’भारतात पोस्टमार्टम सहाय्यक या पदासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाहीये, चतुर्थश्रेणी कर्मचारीच हे काम करतात. आम्ही त्यांना फार तर शरीराचे तुकडे कसे करायचे, शव टेबलवर ठेवल्यानंतर कोणते केमिकल्स वापरायचे याचेच प्रशिक्षण देतो. हे खरं म्हणजे अत्यंत वाईट आहे, कारण नियमांप्रमाणे मृतदेहाची चिरफाड करण्याचे काम त्या त्या डॉक्टरनेच केले पाहिजे. ते एक कौशल्यपूर्ण असं काम आहे आणि त्यासाठी निष्णांत असणं गरजेचं आहे.’’
जात व्यवस्था ही भारताला लागलेली एक कीड आहे आणि ती भारतीय मानसिकतेत ठासून भरलेली आहे. पोस्टमार्टम विभागही त्याला अपवाद नाही. दलित समाजातील या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना रुग्णालयाच्या बाहेर आणि आत अशा दोन्ही ठिकाणी या जातीय व्यवस्थेचा सामना करावा लागतो. ही लोकं तथाकथित ‘अस्पृश्य’ असल्याचे लोकांच्या मनात इतके ठासून भरले आहे की आपल्या सामाजिक उतरंडीमध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम हाच समाज करत असतो आणि म्हणूनच मृतदेहांची चिरफाड करण्याचे कामही याच समाजावर लादण्यात येते.
शवागरामध्ये कोण असतं…? तिथे जळलेले, कुडलेले, सडलेले, तुकड्या-तुकड्यांमधील मृतदेह असतात. दहा-दहा दिवसांपासून सडलेले प्रेत असतं, त्यामुळे कोणतीही शिकलेली व्यक्ती असे काम करायला उत्सुक नसते, मग हे काम कोण करणार तर बोलवा समाजातील शोषित आणि वंचित दलित समाजातील लोकांना…
‘’आता मी त्या मृतदेहांसोबत तडजोड केली आहे.’’
गुरूग्राम येथील शवागरात काम करणारे 40 वर्षांचे एक कर्मचारी सांगतात की, माझा रोजचा दिवस हा शारीरिक आणि मानसिक थकव्याने जात असतो. मृतदेहाची चिरफाड करताना उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्या माझ्या शरीरावर सांडतात, माझ्या डोळ्यांमध्ये जातात. अतिशय सडलेल्या मृतदेहाचे अवयव बाहेर काढताना अंगात ताकदच उरत नाही. हा फक्त शारीरिकच नाही तर मानसिक त्रास देणारा क्षण असतो.
अत्यंत थकलेल्या आवाजात ते सांगतात की, ‘’ज्या लोकांना मी फाडतो ते माझ्या स्वप्नात येतात. सुरुवातीला मला त्याची भिती वाटायची परंतू आता मी त्या मृतदेहांसोबत तडजोड केली आहे परंतू आजही अशी एकही रात्र गेली नाही की मी शांतपणे झोपू शकलो.’’
ते पुढे सांगतात की, शेजारची लोकं मला ‘जल्लाद’ म्हणून टोमणे मारतात. माझ्याबद्दल भीतीदायक कहाण्या सांगतात, माझी मुलं मला नेहमी नोकरी बदलण्यासंबंधी बोलत राहतात. दारूशिवाय मला एकही दिवस राहता येणं मुश्कील आहे, कारण दररोजचे हे घृणास्पद काम करण्यासाठी मला दारूची गरज लागतेच लागते.’’
पोस्टमार्टमच्या या दुनियेत दारुचे व्यसन कॉमन आहे. संतोषी दुर्गाचे वडीलही दारूच्या व्यसनामुळेच गेले. सामाजिक कार्यकर्ते भीम बाफसोर सांगतात की, पोस्टमार्टमचे काम करणारे माझे वडीलही अत्यंत कमी वयात दारुमुळेच मला सोडून गेले.
डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी या देशात चळवळी झाल्या, न्यायालय त्याबातीत सजग झाले आणि बऱ्यापैकी या प्रथेवर बंदी आणली गेली, मात्र शवागरातील या दलित सफाई कामगारांचा मुद्दा अद्याप चर्चेतही आलेला नाही. एका महत्वाच्या क्षेत्रात नरकयातना सहन करणारा एक मोठा घटक असल्याचे कुणाच्या ध्यानीमनीही नाही, त्यामुळे जागरुकता निर्माण करणे ही तर फार लांबची गोष्ट आहे…
(सौजन्य - द प्रिंट)






