एनसीईआरटीची (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग) आठव्या इयत्तेसाठी समाजशास्त्र (सोशल सायन्स) विषयासाठी नवीन पाठ्यपुस्तकं आली आहेत. त्या पुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनतचा कोणताही उल्लेख नाही. आतापर्यंत याच पाठ्यपुस्तकात मुगल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतवर थोडक्यात धडे होते. मात्र 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी समाजशास्त्र विषयाचं जे नवीन पुस्तक आलं आहे, त्यातून हे धडे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
मात्र हे सगळं करताना या पुस्तकांमधून भारताची पहिली महिला शासक रझिया सुलतान आणि मुघल साम्राज्यातील र्वांत शक्तिशाली महिला असलेल्या राणी नूरजहां यांचाही गौरवशाली इतिहास काढून टाकण्यात आल्यामुळे नाराजी पसरली आहे. रझिया सुलतान आणि राणी नूरजहां यांचा संघर्ष, पुरुषसत्ताक राज्यात आपला झेंडा कसा रोवला याबद्दलच्या चित्तथरारक कहाण्या यामुळे शालेय विद्यार्थिनींना निश्चितच प्रेरणा मिळत होती. विशेषत: भारतासारख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत अशा प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या विद्यार्थिनींना सांगणे हे अत्यावश्यक असतानाच एनसीईआरटीने मुघल काळातील या दोन कर्तबगार महिलांना इतिहासाच्या पानांतून गायब केले.
(नूरजहाँ)
मुघल साम्राज्यातील त्याकाळातील सर्वांत शक्तिशाली महिला असण्याचा मान त्यांनी मिळवला होता. मुघल साम्राज्यात आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासात त्यांच्या कारकिर्दीची नोंद गौरवाने घेतली जाते. आजच्या काळात त्यांच्या नेतृत्वाचा इतिहास जाणून घेणं का महत्त्वाचं आहे…?
मुघल साम्राज्याची एकमेव महिला प्रशासक राणी नूरजहाँ
जन्माच्या वेळी तिचं नाव मिह्र-उन-निसा होतं. नंतर तिचं नाव नूरजहां (जगाला प्रकाशमान करणारी) असं नाव तिच्या पतीने म्हणजे मुघल राजा जहांगीरने दिलं. राणी एलिझाबेथ (प्रथम) यांच्या जन्माच्या काही दशकानंतर तिचा जन्म झाला. मात्र नूरजहांने राणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा विविधांगी पद्धतीने राज्यकारभार केला.
16व्या शतकात भारतीय उपखंडात प्रवेश केल्यानंतर मुघलांनी विविध भागावर जवळजवळ 300 वर्षं राज्य केलं. मुघल म्हणजे भारताच्या इतिहासातील एक शक्तिशाली साम्राज्य होतं. मुघल साम्राज्यातील अनेक राजे आणि राण्या कलेच्या उपासक होत्या. त्यात नूरजहांचाही समावेश होता. मुघल राजांनी भारतात अनेक शहरांची स्थापना केली. त्याचबरोबरीने मोठमोठे किल्ले, मशिदी आणि स्मारकंही बांधली. या साम्राज्याची एकमेव महिला प्रशासक म्हणून नूरजहांचा भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या प्रथांमध्ये नेहमीच आजही उल्लेख होतो.
संबंधित लेख वाचा: 1) असं काय आहे ‘त्या’ 25 पुस्तकांत, ज्यावर काश्मीरमध्ये रातोरात बंदी घातली गेली…? |
आग्रा आणि लाहोर या शहरातल्या विविध घरात आणि स्मारकांमध्ये तिच्याविषयीच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. ज्येष्ठ स्त्रिया आणि पुरुष, टूर गाईड, आणि इतिहासात रुची असणारे लोक जहांगीर आणि नूरजहां यांची प्रेमकहाणी रंगवून सांगतात. एका नरभक्षक वाघाच्या तावडीतून एका माणसाला वाचवण्यासाठी त्या वाघाचा आपल्या बंदुकीने तिने कसा वेध घेतला याची कथा सगळीकडे सांगितली जाते.
उत्तम कवयित्री, शिकारी आणि कल्पक वास्तूविशारद
तिच्या प्रेमकहाणीच्या आणि तिच्या शौर्याच्या कथा तर नेहमीच सांगितल्या जातात. मात्र तिचं गतिशील जग, राजकीय क्षेत्रातल्या कुशाग्रबुद्धीबद्दल फारच कमी माहिती लोकांकडे आहे. अनेक अडचणींचा सामना करत तिने राज्य केलं होतं, हे फार कमी लोकांना महीत आहे. ती कवयित्री होती, उत्तम शिकारी होती आणि एक कल्पक वास्तूविशारद होती. तिने तिच्या आईवडिलांच्या स्मारकाच्या केलेल्या रचनेवरून ताज महालाच्या रचनेची प्रेरणा मिळाली होती.
मात्र पुरुषसत्ताक राज्यात आपला झेंडा रोवणारी नूरजहां कोणत्याही राजघराण्यातून आलेली नव्हती. राजकीय कौशल्याच्या जोरावर तिने राजसत्तेचा मुकूट मिळवला होता. ती जहांगीरची सर्वांत आवडती पत्नी आणि मुघल साम्राज्याची सहप्रशासक होती. मात्र त्याकाळात स्त्रियांना सार्वजनिक जीवनात इतकं फारस महत्त्वा नसताना ती इतकी प्रभावी कशी ठरली?
तिच्यावर बालपणी झालेले संस्कार, तिला पाठिंबा देणारे पुरुष आणि स्त्रिया, जहांगीरबरोबर असणारं तिचं विशेष नातं, तिच्या महत्त्वाकांक्षा, ती राज्य करत असलेला परिसर, तिथली लोक अशा बराच गोष्टींबद्लल चर्चा नेहमीच होत असते. सिंधू नदीच्या पार असलेलं हिंदुस्तान अत्यंत श्रीमंत, सर्वसमावेशक होतं. अरब आणि पर्शियन लोक त्याचा भारत असा उल्लेख करत असत, तिथे विविध संस्कृती, धर्म आणि परंपरा एकत्रितपणे नांदत होत्या. 
नूरजहांचा जन्म 1577 मध्ये सध्या अफगाणिस्तानात एका पर्शियन उमरावाच्या घरात कंदाहरमध्य़े झाला. मात्र सफाविद घराण्याच्या असहिष्णुतेला कंटाळून त्यांनी इराण सोडलं आणि मुघल साम्राज्यात त्यांनी आसरा घेतला.
प्रेरणादायी आयुष्य
नूरजहांचा जन्म आणि बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे तिच्यावर वेगवेगळे संस्कार झाले. 1594 मध्ये तिने मुघल साम्राज्यातील एक लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केलं. ती त्याच्याबरोबर बंगालला गेली. एका मुलालाही तिने जन्म दिला. तिच्या पतीवर जहांगीरविरुद्ध कट करण्याचा ठपका ठेवण्यात आला. राजाने त्याला दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. मात्र सुबेदाराच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.
जहांगीरने बायकांसाठी असलेल्या निवासस्थानात विधवा नूरजहांला आश्रय दिला होता. तेव्हा इतर स्त्रियांनी तिच्यावर हळूहळू विश्वास ठेवायला सुरुवात केली. तिने 1611मध्ये जहांगीरशी लग्न केले आणि ती त्याची 20 वी बायको झाली. त्यावेळच्या अधिकृत नोंदीत जहांगीरच्या इतर बायकांची नोंद झाली आहे. जहांगीरने 1614मध्ये लिहिलेल्या आठवणीत जहांगीर नूरजहांबरोबर असलेल्या विशेष नात्याचा उल्लेख करतो. एक संवेदनशील जोडीदार, अत्यंत काळजीवाहू, कसलेली सल्लागार, उत्तम शिकारी, मुत्सद्दी आणि कला उपासक म्हणून जहांगीर तिचा उल्लेख करतो.
गरीब आणि मागासेल्या स्त्रियांना आधार देणं
अनेक इतिहासकारांना असं वाटतं की जहांगीर अत्यंत दारुडा होता आणि राज्य करण्यासाठी लागणारी क्षमता त्याच्यात नव्हती. म्हणून त्याने राज्याचं नियंत्रण नूरजहांकडे दिलं होतं. पण हे संपूर्ण सत्य नाही. जहांगीर दारुडा होता आणि तो अफूचं सेवन करायचा हे खरं आहे. त्याचे बायकोवर प्रेम होतं हेही खरं आहे. मात्र त्यामुळे नूरजहां राणी झाली हे खरं नाही. खरंतर नूर आणि जहांगीर एकमेकांना पूरक होते. आपली बायको राज्यकारभारात ढवळाढवळ करतेय असं कधीही जहांगीरला वाटलं नाही. त्यांच्या लग्नानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या जमिनीच्या हक्काचं रक्षण करण्याचा पहिलाच आदेश काढला. त्यावर नूरजहां पादशाह बेगम असा उल्लेख आहे. याचं भाषांतर नूरजहां महिला प्रशासक असं होतं. हे नूरजहांच्या सार्वभौमत्वाचं द्योतक तर आहेच, शिवाय ताकद वाढतेय असंही अधोरेखित करतं.
1617 मध्ये एका सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यावर जहांगीरच्या मागच्या बाजूला तिचं नाव कोरलेली नाणी वाटायला त्यांनी सुरू केली. दरबारातील इतिहासकार, मुत्सद्दी, व्यापारी आणि भेटी देणाऱ्यांना तिला मिळणारा विशेष दर्जा लक्षात येऊ लागला. तिने एकदा राजांसाठी असलेल्या बाल्कनीत येऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ही बाल्कनी फक्त पुरुषांसाठी राखीव होती. हा प्रसंग दरबारातील एक व्यक्ती सांगते.
तिच्या निडर वागणुकीचं हे एकमेव उदाहरण नाही. शिकार असो, राजकीय आदेश असो, सार्वजनिक इमारतींची रचना असो, गरीब आणि मागासेल्या स्त्रियांना आधार देणं असो त्या काळच्या स्त्रियांच्या कल्पनेपलीकडचं आयुष्य ती जगली. जेव्हा राजाचं अपहरण झालं तेव्हा तिने सैन्याचं नेतृत्वही केलं. तिच्या या धैर्यामुळे तिचं नाव समाजात आणि इतिहासात कायमचं कोरलं गेलं आहे.
भारताची पहिली महिला शासक : रझिया सुलतान
भारताची पहिली महिला शासक रझिया सुलतानचं नाव आलं आणि हेमा मालिनीचा चित्रपट आठवला नाही तर नवलच. कमाल अमरोही यांचा 'रझिया सुलतान' या चित्रपटात हेमा मालिनी यांनी रझियाची भूमिका केली होती तर जोडीला होते अंगभर काळा रंग लावलेले धर्मेंद्र. पण ज्या प्रकारे कथा कादंबऱ्यांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे दिल्लीचे सुलतान (सन 1210 ते 1236) इल्तुतमिशची मुलगी रझिया लाजरीबुजरी नव्हती आणि पडद्याआड मोठी झाली नव्हती.
'वीस मुलांच्या बरोबरीची एक मुलगी'
रझिया एक तरबेज घोडेस्वार, प्रशिक्षित तलवारबाज आणि तीरंदाज होत्या. त्यांचे वडील आणि नंतर विश्वासू काळा गुलाम जमालुद्दीव याकूब यांनी तिला युद्धकलेत पारंगत केलं होतं. रझियाला जनतेवर राज्य कसं करायचं याचंही प्रशिक्षण दिलं गेलं होतं आणि जेव्हा इल्तुतमिश ग्वाल्हेरला एका मोहिमेवर गेले तेव्हा रझियाला राजवटीची जबाबदारी सोपवून गेले होते.
इल्तुतमिशचा सर्वात मोठा मुलगा आणि उत्तराधिकारी नसीरुद्दीन महमूद सन 1229 मध्ये एका लढाईत मारला गेला. त्यांचा आपल्या लहान मुलावर विश्वास नव्हता आणि त्याचा सगळा वेळ फक्त भोगविलासात जायचा. त्यामुळे परंपरेला छेद देत इल्तुतमिशने आपल्या मुलीला, रझियाला आपली उत्तराधिकारी नेमलं. असं म्हणतात की इल्तुतमिश आपल्या मुलीचं वर्णन 'वीस मुलांच्या बरोबरची एक मुलगी' असं करायचा.
पण इल्तुतमिशच्या इच्छेविरुद्ध काही लोकांनी रझियाचा लहान आणि बिनकामाचा भाऊ रुकनुद्दीन फिरोजला गादीवर बसवलं. पण रझिया लढवय्या होत्या, त्यांनी लवकरच परिस्थिती आपल्या बाजूने वळवली.
'राजाचे गुण'
इतिहासकार ख्वाजा अब्दुल्लाह मलिक इसामी त्याकाळातले बखरकार होते. सन 1349-50 या काळात प्रसिद्ध झालेल्या आपल्या 'फुतुहात-ए-सलातिन' या पुस्तकात ते लिहितात की रझिया फाटके तुटके कपडे घालून शुक्रवारची नमाज जिथे अदा होते तिथे आल्या आणि त्यांनी आपली व्यथा लोकांना सांगितली. रझियाचं म्हणणं होतं की, त्यांची सावत्र आई शाह तुर्कन आपला मुलगा रुकनुद्दीन फिरोज याच्यावतीने राज्य करत होती.
तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून रझियाने आपल्या सावत्र आईचं कारस्थान मोडून काढण्यासाठी मदत मागितली. रझियाला या अवस्थेत पाहून आणि त्यांच्या जोरदार भाषणाने तिथले लोक प्रभावित झाले. यामुळे आणि एक स्थित्यंतर घडवणारी गोष्ट घडली होती. रझिया आणि दिल्लीच्या लोकांमध्ये सरळ संवाद सुरू झाला. इसामी लिहितात की या घटनेनंतर रझिया आणि सर्वसामान्य लोक यांच्यात एक करार झाला. या कराराअंतर्गत जर 'रझिया स्वतःला पुरुषांपेक्षा वरचढ सिद्ध करू शकल्या नाहीत तर त्यांचं शिर धडावेगळं केलं जाईल' असं ठरलं.
तोवर त्यांचा सावत्र भाऊ शहरात परत आला होता आणि त्याचा राज्याभिषेक झाला होता. पण शाह तुर्कनला अटक झाली. माय-लेक दोघांनाही 9 नोव्हेंबर 1236 या दिवशी ठार करण्यात आलं. आपला सावत्र भाऊ रुकनुद्दीनला हटवून रझिया 'सुलतान जलालुद्दीन रझिया' या नावाने गादीवर बसल्या.
'सुलताना' नाही तर 'सुलतान' म्हणा
त्या काळात राजघराण्यातल्या महिलांना ज्या पदव्या दिल्या जायच्या, विशेषतः राजकुमारी किंवा राजांच्या पत्नींना ज्या पदव्या दिल्या जायच्या त्या पदव्या स्वीकारायला रझियाने नकार दिला. त्यांच्या दृष्टीने महिलांना दिली जाणारी पदवी कमजोर पदवी होती. रझियाने आग्रह धरला होता की तिला 'सुलताना' नाही तर 'सुलतान' म्हणून संबोधल जावं.
रझियाने महिलेसारखी वेषभूषा सोडून पुरुषांसारखे कपडे घालायला सुरुवात केली. त्यांनी चेहरा झाकणंही बंद केलं. इतिहासकार मिन्हाज-उस-सिराज म्हणतात, "सुलतान रझिया एक महान शासक होत्या. त्या समजूतदार होत्या, इमानदार होत्या, उदार होत्या, न्यायी होत्या. आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी कटीबद्ध होत्या आणि सैन्याच्या सैनापती होत्या. त्यांच्यात ते सारे गुण होते जे एका राज्यकर्त्यात असायला हवे. पण त्यांच्या जन्म चुकीच्या लिंगात झाला होता. त्या एक स्त्री होत्या त्यामुळे पुरुषांच्या दृष्टींना त्यांच्या गुणांना काहीच महत्त्व नव्हतं."
गुलामाच्या प्रेमात पडल्यामुळे दिल्लीच्या या सम्राज्ञीची सत्ता गेली
त्या एका खुल्या दरबारात बसायच्या आणि कुशलतने सगळी प्रकरणं हाताळायच्या. पण रझियाच्या पतनाचं कारण ठरलं एका काळ्या गुलामाशी त्यांची जवळीक आहे ही लोकभावना. रझिया जमालुद्दीन याकूत नावाच्या एका गुलामाच्या प्रेमात होत्या अशी वदंता होती. याकूतला त्यांनी घोडेस्वारांच्या दलाचं प्रमुख बनवलं होतं. यामुळे तुर्कांचा चहालगनी म्हटला जाणारा एक शक्तीशाली गट नाराज झाला. या गटाला वाटायचं की सगळी महत्त्वाची पदं तुर्कांकडे राहिली पाहिजेत.
आजही आपल्याला रझिया आठवते ते एक राज्यकर्ती म्हणून नाही तर एक दुर्दैवी स्त्री म्हणून, जिचं तिच्या गुलामावर प्रेम होतं आणि योगायोगाने ती शासक होती. पण त्या काळातल्या कोणत्याही इतिहासकाराने या प्रेमसंबंधविषयी काहीही लिहिलेलं नाही. इतकाच उल्लेख आढळतो की घोड्यावर चढवताना याकूतला रझियाला स्पर्श करण्याची परवानगी होती. पण घोडेस्वारांच्या दलाचे प्रमुख या नात्याने हे त्यांचं कामच होतं. इल्तुतमिशसाठीही ते हेच करायचे.
जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे रोमान्सच्या नजरेतून पाहायला लागतो तेव्हा हे विसरतो की रझिया किती अवघड परिस्थितीत राज्य करण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात आपल्या वडिलांचे विश्वासू गुलाम आणि त्यांचे शिक्षक असणाऱ्या याकूतवर त्यांचा भरवसा असणं साहजिक होतं.
खरं काहीही असेल पण शक्तिशाली तुर्कांच्या गटाने रझियाच्या विरोधात विद्रोह केला. याकूतची हत्या केली गेली आणि रझियाला कैद केलं. त्यांचे एका काळ्या गुलामासोबत कथितरित्या प्रेमसंबंध होते म्हणून त्यांच्याविरोधात विद्रोह झाला की त्या तुर्कांच्या हातचं बाहुलं बनून राहायला तयार नव्हत्या, स्वतःचे निर्णय स्वतः घेत होत्या म्हणून झाला हे सांगता येत नाही. चहलगानी गटाने मग त्यांचा भाऊ मुइजुद्दीन बहराम याला गादीवर बसवलं.
रझिया कैदेतून पळून भटिंडाला जाण्यात यशस्वी ठरल्या. तिथे आणखी एक तुर्क अमीर मलिक अल्तूनियाशी त्यांनी हातमिळवणी केली. नंतर याच्याशीच त्यांनी लग्न केलं. दिल्लीच्या लोकांनी त्यांना शासक म्हणून निवडलं होतं. त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर रझियांची ताकदच गेली. यानंतर काही काळाने आपल्या भावाच्याविरोधात एका मोहिमेचं नेतृत्व करताना त्यांचा मृत्यू झाला.






