- भागा वरखडे
गेल्या महिन्यात देशांत मोठे बस अपघात झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडूतील अपघाताची विशेष नोंद घेतली गेली. सरकार अपघातांच्या चौकशीसाठी समित्या नेमते. त्याचे अहवाल येतात; परंतु त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. सुरक्षितपणे गाडी चालवण्यापासून ते योग्य सामान साठवणूक आणि बसमधील मार्ग मोकळे करण्यापर्यंत सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असली पाहिजे. सार्वजनिक बसच्या व्यवस्थानापासून सर्वत्र प्रत्येक स्तरावर घोर निष्काळजीपणा दिसून येतो. प्रवाशांच्या जीवाकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा बसला आग लागते, तेव्हा प्रवाशांना पळून जाण्याची संधी मिळत नाही. आता याच मुद्द्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या खंडपीठाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली आहे आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या बस हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रस्ते वाहतूक-महामार्ग मंत्रालयाला नोटीस
सार्वजनिक बसच्या डिझाइनमधील गंभीर त्रुटी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचे या आयोगाने म्हटले आहे. अपघात किंवा आगीनंतर स्वयंचलित बसचे दरवाजे जाम होतात. त्यामुळे लोक आत अडकतात. बसमध्ये जास्त भार टाकणे, आपत्कालीन दरवाजे आणि खिडक्यांचा अभाव किंवा बिघाड यासारख्या असंख्य निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे जीव जातात. डिझाइनमधील गंभीर त्रुटी असलेल्या बस धोकादायक परिस्थितीत रस्त्यावर धावत आहेत, याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पडतो.
प्रवासी बसमध्ये आग लागण्याच्या आणि मृत्यूच्या वारंवार होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी विचार आणि ठोस कारवाई आवश्यक आहे. देशभरात धावणाऱ्या स्लीपर बसच्या वास्तवाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालाने संपूर्ण यंत्रणांचा निष्काळजीपणा उघडकीस आणला आहे. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या बस केवळ सुरक्षा मानकांचे उल्लंघन करत नाहीत, तर अनेक प्रकरणांमध्ये ‘गुन्हेगारी निष्काळजीपणा’ म्हणून वर्गीकृत केल्या गेल्या आहेत. अपघातांच्या वाढत्या संख्येत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्यांना असुरक्षित स्लीपर बसवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व स्लीपर कोच बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सार्वजनिक वाहतूक बसच्या डिझाइनमध्ये वारंवार आढळणाऱ्या आणि घातक त्रुटी प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. चालकाची केबिन प्रवासी डब्यापासून पूर्णपणे वेगळी असते. परिणामी, आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत, चालक किंवा प्रवासी दोघेही एकमेकांशी संवाद साधू शकत नाहीत. अलिकडच्या बस आगीच्या घटनांचा उल्लेख करून, तक्रारदाराने म्हटले आहे, की अनेक मृत्यू टाळता आले असते. हा निष्काळजीपणा संविधानाच्या कलम २१ अंतर्गत हमी दिलेल्या जीवनाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो.
भीषण दुर्घटनेचं धक्कादायक कारण समोर
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार, पुणे येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट’ (सीआयआरटी) ने जैसलमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ११ वर बसला लागलेल्या आगीची चौकशी केली. त्यात २० जणांचा मृत्यू झाला आणि १६ प्रवासी जखमी झाले. तपास अहवालात धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. आग लागलेली स्लीपर बस ‘सेंट्रल मोटर व्हेईकल रूल्स’ (सीएमव्हीआर) आणि ‘एआयएस’:११९ मानकांनुसार बांधलेली नसल्याचे आढळून आले. बसमध्ये अनेक गंभीर दोष होते. ड्रायव्हरच्या केबिनला वेगळे करणारे विभाजन नियमांचे पालन करत नव्हते. स्लीपर बर्थवर बसवलेले स्लाइडर मानकांचे पालन करत नव्हते. खूप कमी आपत्कालीन निर्गमन मार्ग होते. सर्वात गंभीर म्हणजे, बसमध्ये अनिवार्य ‘फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टम’ (एफडीएसएस) नव्हती.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सार्वजनिक वाहतूक बसेसच्या असुरक्षित डिझाइनबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने १९९३ च्या मानवाधिकार कायदाच्या कलम १२ अंतर्गत दखल घेतली. परिवहन मंत्रालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेकडून दोन आठवड्यांच्या आत सविस्तर कारवाई अहवाल मागितला. ‘सीआयआरटी’ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की राजस्थान परिवहन विभागाच्या बसमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. बस बॉडीच्या बांधकामात मानकांचे उल्लंघन करण्यात आले. १२ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या बसला किमान पाच आपत्कालीन निर्गमन मार्ग असणे आवश्यक आहे; परंतु त्यापैकी एकही उपलब्ध नव्हता. स्लीपर कोचवरील ‘स्लायडर’ आणि ‘चेसिस एक्सटेन्शन’सारखे धोकादायक भाग परवानगीशिवाय बसवण्यात आले होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक प्राधिकरणाने म्हटले आहे, की सर्व स्लीपर कोचमधून ड्रायव्हर पार्टीशन काढून टाकावेत, ‘एफडीएसएस’ सक्तीने बसवावेत, दहा किलोचे अग्निशामक यंत्र तपासावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व बस बॉडी डिझाइन तात्काळ बंद कराव्यात. त्यानंतर आयोगाने केवळ उत्पादक आणि बॉडीबिल्डरच नव्हे, तर फिटनेस प्रमाणपत्र जारी करणारे अधिकारी देखील दोषी आहेत, असा ठपका ठेवला आहे. आयोगाने याला गुन्हेगारी निष्काळजीपणा म्हटले आहे. आयोगाने म्हटले आहे, की रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सूचना जारी करावी. निष्काळजी अधिकारी आणि उत्पादकांवर तात्काळ कारवाई करावी, पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई आणि मदत देण्यात यावी.
रस्ते अपघातात एकाच वर्षात १.७३ लाखांहून अधिक मृत्यूची नोंद
भारतात रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे, २०२३ मध्ये रस्ते अपघातात १.७३ लाखांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक मोठे अपघात झाले आहेत. हे अपघात प्रामुख्याने अतिवेग, खराब रस्त्याची रचना आणि ट्रक/बसच्या टक्करींशी संबंधित आहेत. बस मोठ्या आणि प्रशस्त असल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान आरामदायी वाटतात. बरेच लोक असे गृहीत धरतात, की बस मोठ्या असल्याने अपघातादरम्यान त्या लहान वाहनांपेक्षा सुरक्षित असतील. तथापि, बस अपघातात तसे आढळले नाही. उलट, प्रवाशांचे जीवित जास्त धोकादायक असल्याचे आढळले आहे. सुरक्षा प्रतिबंधांचा अभाव, आधार नसलेले किंवा मजबूत नसलेले छप्पर, एअरबॅग्जचा अभाव अशी अनेक कारणे या अपघातातील मृत्यूंना जबाबदार असतात. सर्व बसमध्ये तीन विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये अनिवार्य केल्याने असंख्य जीव वाचतील, असे बहुतांश तज्ज्ञ सुचवतात.
सीट बेल्ट हा जीव वाचवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. तथापि, अनेक बस प्रवासी सीट बेल्ट लावत नाहीत. विमानात जसा सीट बेल्ट सक्तीचा आहे, तसाच तो बसमध्येही करायला हवा. आग वगळता अन्य अपघातात सीटबेल्ट प्रवाशांचे जीवित वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अपवाद वगळता बहुतांश बसमध्ये सीटबेल्टच नाहीत. सीटबेल्ट न लावण्याची सवय बदलण्याची गरज आहे. अपघातामुळे प्रवाशी त्यांच्या सीटवरून खाली पडतात, तेव्हा धोका निर्माण होतो.
बस अपघातांमध्ये दुखापत होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे बसची रचना. बसच्या खिडक्यांमध्ये चांगले खांब आणि मजबूत छप्पर असलेली रचना असेल, तर अपघातादरम्यान ते प्रवाशांवर कोसळण्याची शक्यता कमी असते. संशोधकांनी बसच्या खिडक्यांसाठी एक अनोखा ग्लेझ विकसित केला आहे, जो अपघात झाल्यास प्रवाशांना बाहेर पडण्यापासून रोखतो. वाहनातून पडणे हे बस अपघातातील मृत्यूंचे एक प्रमुख कारण असल्याने, बस सुरक्षेसाठी ग्लेझ केलेल्या खिडक्या अनिवार्य केल्यास जीव वाचू शकतात. बस सुरक्षेसाठी चालक प्रशिक्षण आणि चाचणी आवश्यक आहे.
बहुतेक अपघात चालकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे होतात. जेव्हा एखादी कंपनी चालकांना कामावर ठेवते, तेव्हा त्यांनी खात्री केली पाहिजे, की ते वाहन सुरक्षितपणे चालवण्यास पात्र आहेत, की नाहीत. शिवाय, कंपन्यांनी चालकांना चांगली विश्रांती द्यावी. अंमली पदार्थ किंवा अल्कोहोलच्या प्रभावाखाली काम करणार नाहीत, याची खातरजमा केली पाहिजे. बस देखभाल ही सुरक्षेच्या सर्वात सोप्या; परंतु दुर्लक्षित पैलूंपैकी एक आहे. बस कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यांच्या देखभालीत गुंतवणूक केली पाहिजे. बस देखभालीमुळे ऑपरेटिंग खर्च वाढू शकतो; परंतु ते यांत्रिक बिघाडामुळे संभाव्य अपघातांना प्रतिबंधित करते. जेव्हा देखभालीच्या समस्येमुळे बस अपघात होतो, तेव्हा परिणामी दुखापती आणि मृत्यूंसाठी वाहन मालक जबाबदार असतो.






