- शिखा सर्वेश
स्त्रिया आणि पुरुषांच्या संदर्भात भारतीयांचा जीवनव्यवहार कसा आहे? भारतीय घटना, कायदे आणि ‘सामाजिक प्रबोधनासाठी’ जागोजाग लिहिलेल्या घोषणा यांना आपले कित्येक जीवनव्यवहार कचर्याची टोपली दाखवितात. परंपरांनी स्त्री-पुरुष असमानतेची संस्कृती पिढ्यांपिढ्या पोसली आहे. परंतु बहुतेक माणसे लिंगसमभाव केवळ नाकारण्याला उपयुक्त अशीच पोषकद्रव्ये भारतीय मातीतून शोषून वाढतात. इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे त्यांतली काही माणसे शिक्षणक्षेत्रात काम करतात.
पाठ्यपुस्तके तयार करणारी बहुतांश मंडळी असमानता जोपासणाऱ्या याच मातीच्या पोताशी इमान राखणारी असतात. त्यामुळे आजच्या समाजाचे प्रतिबिंब नकळत, अजाणतेपणी लिंगअसमभावाच्या रूपाने पाठ्यपुस्तकांतून उमटते. ही सहज घडणारी गोष्ट असते. ती कोणी जाणीवपूर्वक करत नसते. मुद्दाम किंवा जाणीवपूर्वक करायची गोष्ट अनेकांना अनेकदा ‘न पटणारी’ असते. ती समानतेचा आग्रह धरते, अनेक क्षेत्रातील असमानतेवर मात करणाऱ्या नव्या समाजाची स्वप्ने पाहते.
या वेगळ्या प्रक्रियेला शिक्षणाचा हातभार लागला पाहिजे. पाठ्यपुस्तकांची निर्मिती होताना या प्रक्रियेचे भान जागे पाहिजे. डुलकी लागली तर वास्तवातील लिंगअसमभाव नकळत प्रकटतो. भाषेच्या पाठ्यपुस्तकांच्या आधाराने महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचे भाषा शिक्षण होते. विद्यार्थी स्वतःच्या गरजा, भावना आणि विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषेचा विचार करायला शिकतात. तेथेच लहानग्यांच्या मनात नाना क्षेत्रातील समानता किंवा असमानता या मूल्यांचीदेखील बीजे पडतात. कालांतराने त्यांतली काही रुजतात आणि वाढतात. 
आई स्वयंपाकघरात काम करतेय आणि वडिल वर्तमानपत्र वाचत आहेत…
जेव्हा आपण लहान मुलांच्या हाती पुस्तकं देतो तेव्हा आपल्याला वाटतं की ही पुस्तकं त्यांना जगाशी जोडतील, त्यांच्या स्वप्नांना पंख देतील, आणि समानतेचा अर्थ शिकवतील. परंतू सत्य हे आहे की, आपल्याकडची पाठ्यपुस्तकं सगळ्यात अगोदर लहान मुलांना हे शिकवतं की समाजात महिलांचे स्थान कुठे आहे आणि कुठे नाही…? गणिताच्या प्रश्नामध्ये ‘रामू शेतात नांगरणी करतोय…’’, इतिहासामध्ये ‘महान राजा’, विज्ञानाच्या पुस्तकात, ‘’शोध लावणारे पुरुष’’ ही त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे… वरवर पाहता ही फारच साधारण गोष्ट वाटेल परंतू तसे होत नाही. त्यांच्यात खोलवर एक अन्याय लपलेला असतो. या पुस्तकांत स्त्रिया फक्त आई, पत्नी किंवा त्यागमूर्ती म्हणूनच दिसतात. पण स्त्रिया वैज्ञानिक, नेते, शोधक किंवा निर्णय घेणाऱ्या भूमिकांमध्ये कुठे आहेत?
आई स्वयंपाकघरात काम करीत आहे, तर वडिल बैठकीच्या खोलीत वर्तमानपत्र वाचत असल्याचे चित्र जेव्हा बालभारतीच्या पुस्तकात छापले होते तेव्हा याच गोष्टीवरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. काही वर्षांपूर्वी मराठी माध्यमांच्या इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकात साडी नेसलेली आई स्वयंपाकघरात भाजी चिरत असून, मुलांकडे लक्ष ठेवत असल्याचे चित्र छायाचित्रांद्वारे दाखवण्यात आले होते. या छायाचित्रातच एक माणूस कारखान्याजवळ उभा असून, तो कारखान्यात नोकरी करीत असल्याचे दाखविण्यात आले होते. यासोबतच मुली सर्व प्रकारची कामे करू शकत नाही, असे आई मुलीला सांगत असल्याचे संवादही प्रकाशित करण्यात आले होते.
शालेय पुस्तकांतील 70 टक्क्यांहून अधिक मुख्य पात्रं पुरुष
एखादं मूल पहिली ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांमधून जेव्हा शिकतं, ज्यात स्त्रिया दुय्यम आहेत आणि पुरुष नायक आहेत, तेव्हा त्या मुलांच्या विचारांवर त्याचा खोल परिणाम होतो. मुलगी हळूहळू मान्य करू लागते की ती कधी वैज्ञानिक किंवा नेता बनू शकत नाही. मुलगा मात्र समजून घेतो की बाहेर जाऊन मोठी कामं करायची जबाबदारी त्याचीच आहे आणि घराची जबाबदारी फक्त मुलींची.
पुस्तकांचा प्रभाव थेट समाजावर पडतो. पिढ्यानपिढ्या जेव्हा मुलं पाहतात की नेते, योद्धे, कलाकार आणि शास्त्रज्ञ हे नेहमी पुरुषच असतात, तेव्हा मोठेपणी ते स्त्रियांच्या नेतृत्वक्षमतेला सहज मान्यता देत नाहीत. म्हणूनच एखादी स्त्री राजकारणात किंवा विज्ञाना क्षेत्रात उंचीवर पोहोचली की समाज तिला ‘अपवाद’ मानतो.
दिल्ली राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) च्या ‘जेंडर ऑडिट’मध्ये असं आढळलं की शालेय पुस्तकांतील 70 टक्क्यांहून अधिक मुख्य पात्रं पुरुष आहेत आणि स्त्री पात्रांपैकी 60 टक्क्यांहून अधिक महिला केवळ घरगुती भूमिकांमध्ये दाखवली गेली आहेत. समाजात ज्या स्त्रिया आज शेतात, कारखान्यात, कार्यालयात आणि विज्ञान क्षेत्रात काम करत आहेत, त्या पुस्तकांत अजूनही फक्त स्वयंपाकघरात आणि मुलांच्या संगोपनातच सीमित आहेत.
SCERT दिल्लीच्या अहवालानुसार, प्राथमिक शिक्षणाच्या पुस्तकांमध्ये स्त्री पात्रं फार कमी आहेत आणि ती देखील ठराविक, पारंपरिक चौकटीत अडकलेली आहेत. हिंदीच्या कथा असोत वा विज्ञानाच्या धड्यातील उदाहरणं, स्त्रिया बहुतेकदा आज्ञाधारक मुलगी, काळजी घेणारी आई किंवा घरात काम करणारी बाई म्हणूनच दिसतात. पुरुष मात्र बाहेर काम करणारे, धाडसी आणि शोध घेणारे दाखवले जातात. म्हणजेच मुलं लहानपणापासूनच शिकतात की “खरं काम” पुरुष करत असतात आणि स्त्रियांच्या वाट्याला दुय्यम कामं येत असतात.
ट्रान्सजेंडर समाजाचा तर पाठ्यपुस्तकात उल्लेखच नाही
जर ट्रान्सजेंडर किंवा क्वीअर समुदायाबाबत बोलायचं झालं तर त्यांचा उल्लेख कुठल्याही शालेय पाठ्यपुस्तकात जवळजवळ नसतोच. यूनेस्कोच्या 2024 च्या ‘जेंडर रिपोर्ट’नुसार, शिक्षणाच्या माध्यमातून जगभरात लिंगसमानता साधण्यात स्त्रिया अजूनही मागे आहेत. जेव्हा पुस्तकांत स्त्रियांच्या भूमिका मर्यादित दाखवल्या जातात, तेव्हा ते थेट मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतात. एक मूल जेव्हा वारंवार बघतं की मुली फक्त सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत, तेव्हा तेच ‘सामान्य’ आहे असं तो समजतो.
‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील यूनेस्कोच्या एका अहवालानुसार, भारतात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात मुलींची टक्केवारी अजूनही कमी आहे. प्राथमिक स्तरावर केवळ 47%, आणि माध्यमिक स्तरावर ती आणखी घटून 43% इतकी आहे. हे केवळ आर्थिक कारणांमुळे नाही, तर या समजुतीमुळे की “मुलींनी तरी शेवटी घरच सांभाळायचं असतं.” म्हणूनच अनेकदा हुशार मुलीही उच्च शिक्षण सोडतात. “इतकं शिकवायचं कशाला?” हा प्रश्न समाज आणि पुस्तकं दोन्ही विचारतात. हा फक्त आकड्यांचा नव्हे, तर मुलांच्या भवितव्याचाही प्रश्न आहे.
खरं तर, शालेय पुस्तकांत आपला पितृसत्ताक समाजच प्रतिबिंबित होत असतो. हा समाज स्त्रियांना चुलीपुरता सीमित ठेवतो आणि तीच विचारसरणी शिक्षणाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे नेतो. पुस्तकांत स्त्रियांची अनुपस्थिती ही चूक नाही तर ते सोयिस्कररित्या मौन आहे. कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला नाही, हे ठरवणारं मौन आहे. त्यामुळे मुलींना आणि स्त्रियांना दुय्यम स्थान देणं अशीच समाजाची रचना बनते.
देशातील 189 राष्ट्रीय संस्थांमध्ये केवळ 5% महिला कुलगुरू
‘सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट’च्या अहवालानुसार, भारतात स्त्रियांचं शिक्षण झालं तरी त्यांना रोजगारात समान संधी मिळत नाही. कारण केवळ आर्थिक अडथळे नाहीत, तर सांस्कृतिक पूर्वग्रह आहेत. जिथे मुलीचं “काम करणं” अजूनही प्रश्नचिन्ह ठरवलं जातं. 2021 च्या ‘इंडिया टुडे’च्या आकडेवारीनुसार, देशातील १८९ राष्ट्रीय संस्थांमध्ये केवळ 5% महिला कुलगुरू किंवा संचालक पदावर होत्या. 1,220 विद्यापीठांच्या सर्वेक्षणातही केवळ 9% महिला कुलगुरू आणि 11% महिला उच्च प्रशासकीय पदांवर आढळल्या. म्हणजेच शिक्षणसंस्थांच्या शिखरावरही स्त्रियांचं प्रतिनिधित्व अत्यल्प आहे.
जर आपण खरोखर समानतेचा समाज घडवू इच्छित असू, तर सुरुवात पुस्तकांपासूनच करायला हवी. का गणिताच्या उदाहरणात “सीमा शेतात नांगरते” असू नये?
का इतिहासात झाशीची राणी, एनी बेसेन्ट किंवा सावित्रीबाई फुले यांना पुरुष नायकाइतकं स्थान मिळू नये? का विज्ञानात आइनस्टाइनसोबत मारी क्युरीचं नाव एकत्र वाचलं जाऊ नये?
बदल होतोय… महिला डॉक्टर पुरुष रुग्णाची तपासणी करतेय
महाराष्ट्रामध्ये बालभारतीने यासंबंधी काही उल्लेखनीय बदल केले. बालभारतीने लिंगभेदाला बाजुला सारत स्त्री-पुरुष समानतेला केंद्रस्थानी ठेऊन नव्या पाठ्यपुस्तकांची आखणी केली आहे. समाजव्यवस्थेचा अभ्यास करीत स्त्रियाही सेवा क्षेत्राममध्ये पुरुषांची कामे यशस्वीपणे करत असल्याची मांडणी नव्या पुस्तकात केली आहे. स्त्रिया घरकाम करतात आणि पुरुष नोकरी करतात, हे यापूर्वीच्या पाठ्यपुस्तकांमधून उभे केलेले चित्र बालभारतीला मोडून काढायचे होते. त्यामुळे त्यांनी पाठ्यपुस्तकांमधून बदल करण्याला सुरुवात केली आहे.
2019 सालामध्ये इयत्ता दुसरीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमधून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इयत्ता दुसरीच्या पुस्तकात महिलांच्या सबलीकरणावर भर दिला आहे. स्त्री आणि पुरुष एकत्रित भाजी चिरत असल्याचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे, तर एका छायाचित्रात महिला डॉक्टर पुरुष रुग्णाची तपासणी करीत आहे. याच छायाचित्रात महिला वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करीत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
अशा छोट्या छोट्या बदलांनी मुलांच्या विचारविश्वावर मोठा प्रभाव पडू शकतो. जेव्हा मुली आपल्या पुस्तकांत स्वतःसारख्या मुलींना स्वप्न बघताना पाहतील, तेव्हा त्यांनाही वाटेल, “मीही हे करू शकते.” आणि मुलगे शिकतील की समानतेचा अर्थ म्हणजे एकत्र चालणं, हुकूम गाजवणं नव्हे.
प्रश्न एवढाच नाही की पुस्तकांत स्त्रिया कुठे आहेत, प्रश्न हा आहे की आपल्या समाजाच्या भविष्यात त्यांचं स्थान कुठे आहे? जर आपण लहानपणापासूनच मुलांना शिकवलं की मुली फक्त सहाय्यक आहेत, तर ते पुढे जाऊन समान नागरिक कसे बनतील?
पितृसत्ता पुस्तकांतही आहे आणि समाजातही. पण बदल शक्य आहे, जर आपण तो स्वीकारायला तयार असू तर. शिक्षण हे त्या बदलाचं पहिलं साधन आहे. आपल्याला अशी पुस्तकं तयार करायला हवीत जी प्रत्येक मुलाला समानतेचं स्वप्न दाखवतील.
कारण साक्षरता म्हणजे केवळ अक्षर ओळखणं नव्हे, तर समानतेचं भान ठेवून जगणं आहे.
आज प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे, “आपल्या शालेय पुस्तकांत स्त्रिया कुठे आहेत?”
आणि त्याचं उत्तर असावं, “त्या तिथे आहेत जिथे समानता आहे, जिथे स्त्री-पुरुष भूमिका वेगळ्या नाहीत, तर समान आहेत.”






