भारताकडून ऑस्कर 2026 साठी 'होमबाऊंड' या सिनेमाचीची अधिकृत निवड झाली आहे. दिग्दर्शक नीरज घायवान यांचा 'होमबाऊंड' हा सिनेमा हिंदी चित्रपटसृष्टीतला असा एक मैलाचा दगड ठरलाय, जो थेट मनाला भिडतो, संवेदना जागृत करतो आणि समाजातल्या वास्तवाशी संवाद साधतो. हा सिनेमा म्हणजे केवळ कथा नाही, तर सामाजिक चिंतन आहे, ज्यामध्ये स्वप्नं आणि वास्तव यांच्यातला संघर्ष, मानवी नातेसंबंधांमधली गुंतागुंत आणि भारतातील कट्टर जातीय, धार्मिक, राजकीय व सामाजिक भेदभाव यांची जबरदस्त मांडणी आहे.
मात्र ‘बाईमाणूस’च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत 'होमबाऊंड' या बहूचर्चित सिनेमाच्या पडद्यामागची गोष्ट… एक अशी गोष्ट जी अनेक प्रश्न उपस्थित करते… जी माणूसकीला जागृत करते, आपल्याला बदलण्यासाठी प्रवृत्त करते आणि आपल्या अंतर्मनाला खोलवर स्पर्श करते.
'होमबाऊंड’ पाहताना सय्यूब सिद्दीकी रडायला लागला…
तर गेल्या आठवड्यात 'होमबाऊंड' प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोहम्मद सय्यूब सिद्दीकी हा तरुण चित्रपट पाहायला थिएटरमध्ये गेला. दुबईतील एका थिएटरमध्ये शनिवारी त्याने चार मित्रांसोबत हा चित्रपट पाहिला कारण हा चित्रपट त्याच्याच आयुष्यावर बेतलेला आहे.
(याच जागी मोहम्मद सय्यूब सिद्दीकीने अमृत प्रसादच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.)
आज सय्यूब 27 वर्षांचा आहे आणि तो सध्या दुबईत काम करतोय… सूरतपासून दुबईपर्यंतच्या या अतिशय खडतर आणि कष्टमय प्रवासात सय्यूबला पदोपदी त्याच्या जिवलग मित्राची म्हणजे अमृत प्रसादची आठवण येतेय आणि 'होमबाऊंड' बघताना त्याच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहत असतात.
सुरतच्या एका कपडा फॅक्टरीत सय्यूब आणि अमृत प्रसाद काम करत असतानाच कोव्हिडची पहिली लाट येते आणि बेमुदत लॉकडाऊन सुरू झाल्याने या दोघांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली असते. अखेर आपल्या मूळ गावी म्हणजे उत्तरप्रदेशला परतण्याचा निर्णय हे दोघे घेतात तेही चालत चालत… रस्त्यातच अमृत प्रसादचा करोनामुळे मृत्यू होतो आणि उत्तप्रदेशमधील गावापर्यंतचा पुढचा प्रवास सय्यूबला त्याच्या मित्राच्या मतृतदेहासोबतच करावा लागतो. ‘होमबाउंड’ हा सिनेमा सय्यूबसाठी त्या प्रदीर्घ प्रवासाची जाणीव करून देणारा होता.
अमृतच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर आणि त्याला वाचवण्याच्या सय्यूबच्या प्रयत्नांची कहाणी व्हायरल झाल्यानंतर, सय्यूब पुन्हा घर सोडून काम शोधण्यासाठी बाहेर पडला. 2023 पासून तो दुबईतील इमारतींच्या बांधकामावर मजुर म्हणून काम करतोय.
संबंधित लेख वाचा: 124 जवानांना सोबत घेत 1300 चिनी सैनिक मारणाऱ्या मैजर शैतान सिंह यांच्यावरच्या ‘120 बहादुर’ सिनेमाला का होतोय विरोध? |
“संधी मिळताच मी निघालो,” असं सय्यूब सांगतो. दुबईत तो आणखी चौघांसोबत एकच खोली शेअर करतो, सगळे उत्तर प्रदेशचेच. त्यातील दोघे त्याच्या बारहुवा देवरी (बस्ती जिल्हा) या गावचे आहेत. “सध्या मी दरमहा 12,000 ते 13,000 रुपये घरी पाठवतो,” असं सय्यूब सांगतो.
सय्यूब आणि अमृतच्या घनिष्ठ मैत्रीची गोष्ट…
दुबईला जाण्यापूर्वी कोव्हिडच्या अगदोर सय्यूब आणि अमृतला नेमकं हेच करायचं होतं. अत्यंत हलाखीत जगणाऱ्या आपल्या कुटुंबासाठी चार पैसे कमवून देणं. म्हणूनच दोघे सुरतला कामासाठी गेले होते. दोघेही बालपणीचे मित्र…बस्ती जिल्ह्यातील बारहुवा देवरी या हिंदूबहुल वस्तीत अवघ्या 600 मीटर अंतरावर दोघांची घरं होती. दोघेही तेथील एका सरकारी शाळेत एकत्र शिकले, शिक्षण अर्धवट सोडून दिल्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने कामाच्या शोधात घरातून बाहेर पडले आणि पुन्हा एकत्र आले ते थेट सुरतमध्ये. अमृतने सुरतच्या एका कपडा फॅक्टरीत नोकरी शोधली होती आणि त्यानेच मग सय्यूबला सुरतला बोलावून घेतलं. युपीचे अनेक स्थलांतरित कामगार या फॅक्टरीमध्ये काम करायचे.
करोनाची लाट आल्यांतर मे 2020 मध्ये केंद्र सरकारने तातडीचा लॉकडाऊन जाहीर केला आणि सुरतची ती कापड गिरणी बंद पडली. तेव्हा हे दोघे 33 वर्षांचे तरुण गावाकडे परतण्यासाठी 1,500 किमी प्रवासाला निघाले. उन्हाळ्यात मजुरांनी गच्च भरलेल्या ट्रकमध्ये बसून जाताना, मध्य प्रदेशातील शिवपुरी गाठेपर्यंत अमृत आजारी पडला. सय्यूबने ड्रायव्हरला वैद्यकीय मदतीसाठी थांबण्याची विनंती केली, पण इतर प्रवासी अमृत सतत खोकतोय म्हणून नकार देऊ लागले. अखेरीस सय्यूबला आजारी अमृतसोबत ट्रकमधून खाली उतरावे लागले. आता सय्यूबचे सगळे प्रयत्न अमृतला बरं करणं आणि वैद्यकीय मदत मिळवून देणं यासाठी होते.
सय्यूब आणि अमृतचा तो दुदैवी क्षण एकाने कॅमेऱ्यात टिपला अन्…?
मध्यप्रदेशच्या हायवेवरून चालतच आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत असताना अमृत बेशुद्ध पडला आणि रस्त्यातच कोसळला. सय्यूबने अमृतचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता. त्याच दरम्यान तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलवरून या दोघांचा फोटो काढला.
त्या घटनेबद्दल सय्यूब सांगतो की,रस्त्याच्या कडेला मी अमृतचं डोकं मांडीवर ठेवलं होतं आणि ओल्या रुमालाने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो. एका वाटसरूने हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो लगेचच व्हायरल झाला. अखेर तो फोटो अमृतच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी सय्यूबला फो
न करायला सुरुवात केली.
(दुबईत बांधकाम मजूराची नोकरी करणारा सय्यूब.)
अमृतला वाचवण्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि अखेर त्याचे हायवेवरच निधन झालं. सय्यूबने ऍम्ब्युलन्स बोलावली आणि आपल्या मित्राचा मृतदेह घेऊन दोन दिवसांनी तो 17 मे 2020 रोजी गावी पोहचला.
सय्यूब आणि अमृतच्या मैत्रीच्या कहाणीचा असा दुदैवी शेवट झाला.
दिग्दर्शक नीरज घायवान सय्यूबच्या घरी पोहचतो तेव्हा…
“अमृतच्या मृत्यूनंतर वर्षभरानं दिग्दर्शक नीरज घायवान माझ्या घरी आले होते आणि त्यांनी या घटनेवर चित्रपट करायची इच्छा व्यक्त केली,” सय्यूब सांगतो. नीरज यांना ही कहाणी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मधील बशारत पीर यांच्या लेखातून कळली होती. बशरत पीर हे एक लेखक आहेत. सोशल मीडियावर जेव्हा त्यांनी सय्यबू आणि अमृतचा व्हायरल झालेला फोटो पाहिला तेव्हा त्यांना राहावलं नाही आणि दलित आणि मुस्लीम अशा या जिवलग मित्रांच्या कहाणीचा शोध घेण्यासाठी ते थेट त्यांच्या गावी पोहचले होते. या दोघांच्या आयुष्यावर बशरत पीर यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये ‘’A Friendship, a Pandemic and a Death Beside the Highway’’ असा एक दीर्घ लेख लिहिला होता. याच लेखाच्या आधारे नीरज घायवान यांना ‘होमबाऊंड’ची कथा सुचली.
(हेच ते छायाचित्र जे न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झाले होते.)
नीरज घायवान यांनी सय्यूबला या घटनेवर चित्रपट येणं का महत्वाचं आहे समजावून सांगितलं. सध्याच्या नकारात्मक वातावरणात मुस्लिम आणि दलित मित्रत्वाची ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, हे पटल्यानंतर मी परवानगी दिली, असं सय्यूब सांगतो. पुढे घायवानची टीम सतत त्याच्याशी संपर्कात राहिली, त्याच्या आयुष्याबद्दल तपशील विचारत राहिली.
गेल्या बुधवारी नीरज घायवानने सय्यूबला ‘होमबाऊंड’ची तिकिटे पाठवली आणि मग सय्यूब आपल्या चार मित्रांसोबत दुबईच्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघून आला. ‘चित्रपट पाहताना सगळ्या आठवणींनी अस्वस्थ केलं,” सय्यूब सांगतो.
‘’काही गोष्टींमध्ये नाट्यमय बदल केले गेले आहेत. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मी आणि अमृतने कधीही पोलिस बनायची स्वप्नं पाहिली नव्हती, परंतू नीरज घायवानने अप्रतिम सिनेमा बनवला आहे.’’ सय्यूब म्हणतो.
सध्याच्या नकारात्मक वातावरणात मुस्लिम आणि दलित मित्रत्वाची गोष्ट
दोन मित्र, पोलिस दलात नोकरी मिळवून समाजात मान-सन्मान मिळवण्याची त्यांची धडपड, त्या धडपडीमुळे मैत्रीत आलेला दुरावा, महत्त्वाकांक्षा, निष्ठा आणि समाजाच्या अपेक्षांचं ओझं हे सगळं 'होमबाऊंड' मध्ये गुंफलं आहे. उत्तर भारतातील एका लहानशा राज्यात राहणाऱ्या चंदन कुमार (विशाल जेठवा) आणि मोहम्मद शोएब (इशान खट्टर) या दोन तरुण मित्रांच्या जीवनातील संघर्ष पाचवीला पूजलेला आहे. या दोघांसाठी 'पोलिस भरती' ही केवळ नोकरी नाही, तर सन्मानाचा, स्वाभिमानाचा आणि सामाजिक स्वीकाराचा मुद्दा आहे.
(होमबाऊंड चित्रपटात सय्यूब आणि अमृत या मित्रांची भूमिका साकारणारे विशाल जेठवा आणि इशान खट्टर.)
जातिवाद आणि धार्मिक द्वेष यामुळे सतत भेदभावाचा सामना करणाऱ्या या तरुणांसाठी पोलिसांचा गणवेश म्हणजे फक्त कपडे नाहीत, तर अस्तित्वाचं कवच आहे. समाजात आपली जागा मिळवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याची त्यांची धारणा आहे. कथानकात, पटकथेत, व्यक्तिरेखांमध्ये आणि संवादांत - चहूबाजूंनी प्रतिकात्मक भाव दिसतो. अचानक आलेल्या लॉकडाऊननं चंदन आणि शोएब यांच्या - आयुष्याचं कालचक्र मोडून टाकलं आहे. घर आणि कुटुंबापासून हजारो मैल दूर असलेले हे दोघं एका भीषण वास्तवाशी सामना करत असतात, ज्यात - गरिबी, भेदभाव आणि असुरक्षितता यांचं वादळ - उठलंय. घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा पायी 'प्रवास' म्हणजे 'होमबाऊंड' आहे.
सय्यूब आजही आपल्या मित्राच्या कुटुंबाला मदत करत असतो
‘होमबाउंड’च्या बातमीने, बारहुवा देवरी (सुमारे 2,000 लोकसंख्या) या गावात चर्चा रंगली आहे. सुमारे दोन हजार वस्तीचं हे गाव आहे, मात्र इथं कुणीही चित्रपट पाहिलेला नाही. जवळचं ‘बादशाह’ नावाचं सिनेमागृह 25 किमीवर आहे. गावाचे ग्रामप्रमुख रामभवन चौधरी सांगतात, “होमबाउंडबद्दल आम्ही ऐकलं आहे. बहुतेक सय्यूबनेच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ही बातमी शेअर केली होती... अजून कुणी चित्रपट पाहिलेला नाही, पण सगळ्यांना पाहायची उत्सुकता आहे.”
(सय्यूब आणि अमृत यांच्या कथानकरावर होमबाऊंड सिनेमा दिग्दर्शित करणारे नीरज घायवान.)
अमृत प्रसाद कुटुंबााचा मुख्य कमावता होता. त्याच्या मृत्यूनंतर आई सुभावती, पाच बहिणी आणि एक धाकटा भाऊ हे आता कसाबसा संसाराचा गाडा हाकताहेत. अमृतचे वडील रामचरण सांगतात की, ‘होमबाउंड’च्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधला होता, पण नंतर संवाद राहिला नाही. माहिती गोळा करून ते निघताना आम्हाला 10,000 रुपये दिले... मला चित्रपट निघालाय याबद्दल काही माहितीच नाही.”
सय्यूबने मात्र आजही अमृतच्या कुटुंबाशी नाळ तोडलेली नाही. रामचरण सांगतात की, माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नांत सय्यूबने आम्हाला पैशाने मदत केली होती.
सय्यूब म्हणतो, अमृतच्या मृत्यूनंतर तो परत सूरतला गेला नाही. मित्राविना ते शक्यच नव्हतं. पुढची तीन वर्षं त्याने शेतात कुटुंबासोबत काम केलं. “पण मी कायम ठरवलं होतं की दुबईला जायचं... चांगल्या आयुष्यासाठी पैसे कमवायचे.”
होमबाऊंड या शब्दाचा अर्थ आहे घरी परतणारा… मात्र सय्यूबसाठी सध्यातरी हे शक्य नाही. त्याची खंत वेगळीच आहे. अमृतसोबतचे अनेक फोटो त्याच्या जुन्या मोबाईलमध्ये होते. मात्र जुना मोबाईल खराब झाल्यामुळे आता त्याच्या दोस्तीच्या सगळ्या आठवणी हरवून गेल्या आहेत.






